प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगवेळी कीडा चावला, अभिनेता थेट रुग्णालयात, श्वास घेण्यास त्रास; बॉलिवूडमध्ये खळबळ
बॉलिवूड अभिनेते राजेश शर्मा यांना प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान कीडा चावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उजव्या पायात संसर्ग होऊन श्वास घेण्यास त्रास होत आहे. प्रकृती चिंताजनक असून रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स नवरा संजय कपूर यांचं घशात मधमाशी गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मा यांना चित्रिकरणावेळी कीडा चावल्याने रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. अभिनेत्री सुदीपा चटर्जी हिने राजेश शर्मा यांच्या कुटुंबियांच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. राजेश यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुदीपा चॅटर्जी यांनी पोस्टमध्ये माहिती दिली आहे. तब्येत बिघडल्याने राजेश शर्मा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं सुदीपा यांनी म्हटलं आहे. भूत बंगला, भूल भुलैया 3, क्रू, लक्ष्मी आणि डार्लिंग्स आदी सिनेमात राजेश शर्मा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सेटवर साप चावला, कीडा चावला की विंचवाने चावा घेतला हे सुद्धा राजेश यांना माहीत नाहीये. पण चावा घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जंगलातच चावला…
राजेश शर्मा हे रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभास अभिनित स्पिरीट या सिनेमाचं शुटिंग करत होते. त्यावेळी त्यांना कीडा चावला. कदाचित हा विषारी कीडा असेल. पॅकअप झाल्यानंतर जंगलात राजेश हे एका टेक्निशियन्ससोबत बोलत होते. त्यावेळी त्यांना कीडा चावला. त्यांना त्याची जाणीव झाली. सुरुवातीला ते फार गंभीर वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी कोणताही वैद्यकीय उपचार न घेता शुटिंग सुरू ठेवली, असं सुदीपा यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
तरीही विमााने प्रवास
तब्बल सहा तासानंतर राजेश यांच्या उजव्या पायात भयंकर वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. तब्येत बिघडलेली असतानाही त्यांनी कोलकाता जाणारी फ्लाईट पकडली. प्रवासात तर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना ताप भरला. अस्वस्थ वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी त्यांना ढाकुरिया येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून राजेश रुग्णालयात आहेत. पण त्यांचा ताप काही उतरलेला नाही. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्या उजव्या पायाचं संक्रमण वाढत आहे, असंही सुदीपा यांनी म्हटलंय.
प्रकृती कशी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायाच्या बोटांपासून गुडघ्यापर्यंत इन्फेक्शन वाढलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही. राजेश यांच्यावर डॉक्टर अविजित भट्टाचार्य आणि त्यांची टीम इलाज करत आहे. काही कॉम्प्लिकेशनमुळे त्यांच्या बॉडीत ब्लड कॉट झाल्याचा संशय आहे. त्यांच्या फुफ्फुसापर्यंत ते पोहोचल्यास जीवघेणं ठरू शकतं. राजेश यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे हे अद्याप सांगता येत नाही.