‘धुरंधर 2’नंतर हा ठरेल ब्लॉकबस्टर.. मृणाल ठाकूरच्या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर
मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांचा 'डकैत' हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धुरंधर 2'नंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचू शकतो, असा अंदाज नेटकरी ट्रेलर पाहिल्यानंतर व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डकैत’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता चित्रपट प्रदर्शनाच्या अवघ्या एक आठवडा आधी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर लाँच करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली आहे. ‘डकैत’ हा चित्रपट खरंतर 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’मुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ‘डकैत’ हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्याशिवाय दिग्दर्शक अनुराग कश्यपचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याचा लूक थक्क करणारा आहे.
‘डकैत’चा ट्रेलर
‘डकैत’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर यांच्यानेच होते. हे दोघं कपल असून त्यांना लग्न करून संसार थाटायचा असतो, परंतु परिस्थिती अशी बनते की मृणाल तिच्या प्रियकराचीच म्हणजेच अदिवीची फसवणूक करते. काही अनपेक्षित घडामोडींमुळे अदिवीला तुरुंगात जावं लागतं. त्याचं अर्ध आयुष्य तुरुंगातच निघून जातं आणि मनात मृणालचा सूड घेण्याची भावना अधिक तीव्र होत जाते. अखेर एकेदिवशी संधी सांधून तो तुरुंगातून पळून जातो आणि मृणालला शोधू लागतो.
मृणाल ठाकूरशी त्याची भेट होते, परंतु त्यावेळी त्याला समजतं की तिला एक मुलगी आहे. ती एका मोठ्या समस्येत अडकलेली असते, तेव्हा अदिवी तिची मदत करतो. मृणालला पैशांची खूप गरज असते, म्हणून ती अदिवीसोबत मिळून पैसे चोरीचा प्लॅन आखते. तेव्हा या दोघांची भेट पोलीस अधिकारी अनुराग कश्यपशी होते. ‘डकैत’चा ट्रेलर जबरदस्त असून प्रेक्षकांनाही तो खूप आवडला आहे. या ट्रेलरवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘धुरंधरनंतर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्यालायक वाटतोय’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘धुरंधरनंतर हा चित्रपट रेकॉर्ड बनवणार’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
‘डकैत’मध्ये प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, जैन मेरी खान आणि कामाक्षी भास्करला यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शनेल देवने केलं आहे. तर पटकथा अदिवी शेष आणि शनेल देव यांनीच लिहिली आहे. या चित्रपटाला तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये शूट करण्यात आलं आहे.
