3 महिन्यांत 8 नव्या मालिका; टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी घोषणा
पुढील तीन महिन्यात आठ नवीन मालिका आणि शोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच या मालिकांची आणि कार्यक्रमांची घोषणा केली. या मालिका कोणकोणत्या आहेत, ते जाणून घ्या..

महाराष्ट्रच काय तर भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एखादी वाहिनी एकाच वेळी एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नव्या कार्यक्रमांची घोषणा करतेय. पाठराखीण, सुना येती घरा, विसरु नका मला, आमच्या लाडक्या नाईक बाई, मराठी मिडीयम, मी कात टाकली, आता होऊ दे धिंगाणा 5 आणि स्टार प्रवाह गणेशोत्सव अशा तब्बल 8 नव्या कार्यक्रमांची घोषणा नुकतीच करण्यात आली. हे सर्व कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
पाठराखीण
‘पाठराखीण’ ही गोष्ट प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची आहे. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या सुपरहिट मालिका देणारी निर्मिती संस्था अर्थात सोहम प्रोडक्शन्स या मालिकेची निर्मिती करत आहे. प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी, अदिती देशपांडे, मिताली जगताप, शकुंतला नरे, रमेश वाणी, दीप्ती लेले असे अनेक दिग्गज कलाकार मालिकेत आहेत. विघ्नेश कांबळे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.
सुना येती घरा
नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशाच नात्यांच्या अनोख्या गुंफणीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘सुना येती घरा’. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. अशोक शिंदे, मेघना वैद्य, दीपा परब, शर्मिष्ठा राऊत, सत्यजीत साळोखे, शुभम पडे, सिद्धव साळोखे, मनोज कोल्हटकर असे अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत.
विसरू नको तू मला
विसरु नको तू मला एक उत्कट प्रेमकथा आहे. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारा नायक आणि आपल्या स्वप्नांबरोबर या सच्च्या प्रेमाला सोबत घेऊन जाणारी नायिका यांची ही गोष्ट असणार आहे. तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर,शृजा प्रभुदेसाई, शर्वाणी पिल्लई, राजेंद्र शिसाटकर, सिद्धार्थ खिरिड असे अनेक लोकप्रिय कलाकार मालिकेत आहेत. निर्माते आणि लेखक सचिन दरेकर यांनी मालिकेची कथा लिहिली आहे.
मराठी मीडियम आणि आमच्या लाडक्या नाईक बाई
चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या लेखक दिग्दर्शक जोडीने आजपर्यंत अनेक दर्जेदार आणि सुपरहिट मालिका दिल्या आहेत. हीच लेखक दिग्दर्शकाची जोडी आता घेऊन येतेय मराठी अस्मिता टिकवणाऱ्या मराठी मीडियमची गोष्ट. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेतून भेटीला येतील. अनेक अस्सल मातीतल्या दर्जेदार मालिकांचे लेखक दिग्दर्शक निर्माते आपल्यसाठी घेऊन येतायत आमच्या लाडक्या नाईक बाई ही मालिका. एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची गोष्ट सांगणारी ही मालिका असणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत.
मी कात टाकली आणि आता होऊ दे धिंगाणा 5
चमत्कारिक, गूढ, रहस्यमय आणि नाट्यमय कथांचा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांच्याही मनोरंजनासाठी स्टार प्रवाह सज्ज आहे. आणि म्हणूनच या मनोरंजनाच्या आख्यानात येणारी पुढची मालिका म्हणजे मी कात टाकली. संतोष अयाचित या मालिकेती निर्मिती करणार आहेत. मालिकांमध्ये कितीही सोशिक, रागीट, प्रेमळ अशी कोणतीही भूमिका असली तरी एक असं ठिकाण आहे जिथे हे सगळे मुखवटे गाळून पडतात आणि प्रत्येक कलाकार कसा धिंगाणेबाज आहे हे जिथे कळतं तो कार्यक्रम म्हणजे आता होऊ दे धिंगाणा. या कार्यक्रमात आता पाचपट मजा येणार पाचपट धिंगाणा होणार आहे, कारण हा असणार आहे आता होउ दे धिंगाणा सिझन 5.
भव्य दिव्य सोहळे ही स्टार प्रवाहची खासियत आहे. त्याच साखळीतला पुढचा सोहळा म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणारा महाराष्ट्राचा लाडका सोहळा यंदा पुन्हा त्याच जोशात साजरा होईल, ज्याचं नाव आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव 2026.
