‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
या व्हिडिओमुळे संतोष डावखर यांची एक वेगळीच ओळख समोर आली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून कथा सांगणारे दिग्दर्शक प्रत्यक्ष आयुष्यात मात्र निसर्गाशी जोडलेली खरी गोष्ट जगताना दिसत आहेत. त्यांच्या या अनोख्या कार्यामुळे ‘गोंधळ’चे दिग्दर्शक आता सोशल मीडियावर ‘रिअल लाइफ हिरो’ म्हणून चर्चेत आले आहेत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित ‘गोंधळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर साधारण दहा वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये ते सापांचं रेस्क्यू करताना दिसत आहेत. पडद्यामागे कथा घडवणारा दिग्दर्शक प्रत्यक्ष आयुष्यात सर्पमित्र म्हणून कार्यरत असल्याचं पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये संतोष डावखर अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने साप हाताळताना दिसतात. कोणतीही घाईगडबड किंवा भीती न दाखवता, सापाला कोणतीही इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत ते त्याला सुरक्षितपणे पकडतात. त्यांच्या या कार्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
संतोष डावखर हे डोंबिवलीस्थित ‘नेचर सेव्ह सोसायटी’ या कल्याण डोंबिवलीमधील संस्थेशी जोडलेले असून, सचिन जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत. 2015 पर्यंत या टीमने केडीएमसी परिसरातून अधिकृतरीत्या 8500 हून अधिक सापांचं पुनर्वसन येऊर नॅशनल पार्क, मानकोली फॉरेस्ट, कर्नाळा अभयारण्य आणि बोरीवली नॅशनल पार्क परिसरात केलं आहे. अनेकदा वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकं घेतली जातात. विद्यार्थ्यांना सापांविषयी योग्य माहिती, प्रथमोपचाराची माहिती आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूक केलं जातं.
संतोष डावखर यांचा व्हिडीओ-
View this post on Instagram
याबद्दल संतोष डावखर म्हणाले, ”भारतात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला, मग तो माणूस असो, प्राणी असो किंवा अगदी सूक्ष्म जीव. या सर्वांचा निसर्गसंपत्तीवर तितकाच हक्क आहे. प्रत्येकाला या भूमीवर जगण्याचा अधिकार आहे. साप हा अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर ही साखळी कोलमडली, तर त्याचे दूरगामी परिणाम पर्यावरणावर होऊ शकतात. त्यामुळे अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप आणि असेच निगडित असलेले सर्व जीव वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. लोक सापाला फक्त धोक्याच्या दृष्टीने पाहातात, पण प्रत्यक्षात साप आपल्यावर हल्ला करायला पुढे येत नाहीत. आपण भीतीपोटी चुकीच्या प्रतिक्रिया देतो. योग्य पद्धतीने हाताळलं, तर सापांनाही वाचवता येतं आणि माणसांनाही सुरक्षित ठेवता येतं. त्यामुळे साप दिसल्यास घाबरण्यापेक्षा सर्पमित्रांना बोलावणं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणं हेच योग्य आहे.”
“मात्र माहिती नसताना साप कोणीही हाताळू नये कारण बरेच सर्पमित्र साप पकडताना अपघाताने सर्पदंश होऊन ॲन्टिव्हेनम न मिळाल्यामुळे जीवाला मुकले आहेत. जर सर्पदंश झालाच, तो विषारी असो वा बिन विषारी त्वरीत जवळच्या सरकारी रुग्णालयात धाव घ्या. कारण हे ॲन्टिव्हेनम केवळ सरकारी रुग्णालयातच उपलब्ध असतात. बाहेर ते महाग असतात. त्यामुळे नेहमीच काळजी घ्यावी,” असं आवाहनही संतोष डावखर यांनी केलं.
