‘हा चित्रपट शेतकऱ्यासाठी…’ ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या कथेबद्दल महेश मांजरेकरांचा खुलासा
महेश मांजरेकरांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. हा चित्रपट 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चा सिक्वेल नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांवर, त्यांच्या आत्महत्येच्या विचारांवर आधारित असून, मांजरेकरांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतेय’चा हा सीक्वेल नाही, असं आधीच महेश मांजरेकरांनी स्षष्ट केलं आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिक्वेल, प्रिक्वेल किंवा दुसरा भाग नाही.” असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
भिवंडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात चित्रपटाचे प्रमोशन
दरम्यान आता महेश मांजरेकर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले दिसत आहे. त्यांनी आज (25 ऑक्टोबर 2025) रोजी भिवंडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ), मराडेपाडा येथे त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टीमसोबत आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ते महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात आले होते. तेव्हा त्यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,”या चित्रपटाने निमित्ताने या ठिकाणी आलो पाहिलं. मंदिर अत्यंत भव्य दिव्य आहे. महाराष्ट्रात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे मी इथे येऊन चित्रपट प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या मंदिरात यावं ही माझी इच्छा होती.” असं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या विषयातला हा चित्रपट
तसेच पुढे त्यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल स्पष्ट करत म्हटलं की,” हा चित्रपट ” ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ याचा पार्ट 2 नाही. हा नक्कीच वेगळा चित्रपट आहे जो मी दिग्दर्शित केलेला आहे. शेतकऱ्यांच्या विषयातला हा चित्रपट आहे. शेतकऱ्याची आत्महत्या, तळमळता ही सामान्य नागरिकांना देखील समजली पाहिजे. सरकार सरकारची भूमिका बजावतात त्यांच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई देता परंतु माणूस म्हणून आपण या ठिकाणी समजलं पाहिजे त्यासाठी हा चित्रपट तयार केलेला आहे. ” असं म्हणत त्यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल मोठा खुलासा केला आहे.
महेश मांजरेकरांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती
महेश मांजरेकरांनी चित्रपटाच्या कथेबाबत सांगत शेतकऱ्यांनाही एक कळकळीच आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं ,”शेतकऱ्याला माझं एवढंच म्हणणं असेल आत्महत्या आज करू नका उद्या करा, आज त्या ठिकाणी कोणाची तरी बोला तुमचं मन हलकं करा म्हणजे महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाहीत”
महेश कोठारेबाबत प्रश्न विचारला असता…
दरम्यान महेश मांजरेकरांना महेश कोठारेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की ” महेश कोठारे माझ्या चित्रपटात नाही आणि माझ्या आजच्या या प्रमोशनमध्ये देखील नाही.” असं म्हणत त्यांनी महेश कोठारे यांच्यासंदर्भात बोलणे टाळले आहे. चित्रपटाचा ट्रेलर तर नक्कीच सर्वांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्याही मनात आहे.
