ग्लॅमर विश्वात मन अस्थिर होताच अध्यात्माकडे वळले सेलिब्रिटी; काहींनी घेतला संन्यास तर काही..
बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या विश्वात एकदा कोणी आलं की मग तो त्याच इंडस्ट्रीत रमून जातो, असं म्हटलं जातं. पैसा, प्रसिद्धी, ऐशोआराम हे सर्व सोडायची इच्छा सहसा कोणाची होत नाही. मात्र फिल्म इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी झगमगतं ग्लॅमरचं विश्व सोडून संन्यास घेतला. यात ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहे.

ग्लॅमर इंडस्ट्री हे एक असं क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक कलाकाराचं मोठं स्टार बनण्याचं स्वप्न असतं. अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ग्लॅमरचं विश्व हे स्वप्नवत असतं. असंख्य कलाकार या क्षेत्रात काम करण्यासाठी येतात, पण त्यापैकी मोजक्याच लोकांचं नशीब फळफळतं. इंडस्ट्रीत असेही कलाकार आहेत, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रचंड यशस्वी झाले आणि दुसरीकडे काहीजण असेही आहेत, ज्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने ते दुसऱ्या क्षेत्राकडे वळले. या सगळ्यात तिसरा गट असाही आहे, ज्यामध्ये ठराविक कलाकारांनी यश आणि ग्लॅमर विश्वाची मनसोक्त चव चाखली आणि त्यानंतर त्यांनी स्वत:हून या सर्वांपासून दूर जाण्याचं ठरवलं. पैसा, प्रसिद्धी मिळाल्यानंतर हे कलाकार अध्यात्माकडे झुकले. या यादीतलं ताजं नाव म्हणजे अभिनेत्री ममता कुलकर्णी. उत्तर प्रदेशातल्या प्रयागमध्ये होणाऱ्या महाकुंभमध्ये तिने संन्यास घेतला आणि ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली. ममताच्या आधी इतर अनेक कलाकारांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. ...
