नटसम्राट ज्यांनी ज्यांनी केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले..; नाना पाटेकरांनी सांगितलं नाटक नाकारण्यामागचं कारण
नागपुरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी 'नटसम्राट' नाटक नाकारून चित्रपट करण्यामागचं कारण सांगितलं आहे. ज्यांनी ज्यांनी नटसम्राट केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा गेलो असतो.. असं नाना थेट म्हणाले.

नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर खान, नाम फाऊंडेशनेचे अध्यक्ष नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परिषदेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. देशातील, राज्यातील विविध समस्या, नाम फाऊंडेशनचं काम आणि जाती-धर्मावरून सुरू असलेलं राजकारण याविषयी त्यांनी भाष्य केलं. त्याचवेळी त्यांनी त्यांचा अभिनयातील प्रवास उलगडताना ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा उल्लेख केला. नटसम्राट हे नाटक न करता चित्रपटात का भूमिका साकारली, याचं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.
“मी त्यांना सांगितलं की मी नटसम्राट नाटक करणार नाही, चित्रपट करेन. कारण एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी त्यात पूर्ण आपला जीव ओतावा लागतो. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणं ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकवणारी आणि अत्यंत आव्हानात्मक होती. मला असं वाटतं की या नाटकाचे 10, 15 किंवा 25 प्रयोग केले असते, तर त्यानंतर मी मेलोच असतो. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट्ट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त या सर्वांनीच नटसम्राट केलं. ज्यांनी ज्यांनी ते नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकने गेले. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगात जीव ओतावा लागतो. त्याशिवाय प्रेक्षकांना आनंद देताच येणार नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले.
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेची तीव्रता एवढी प्रचंड आहे की कलाकाराच्या हृदयावर खूप ताण येतो. म्हणूनच मी नाटकाला स्पष्ट नकार दिला होता. पुढे मी फक्त चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.” तर दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे माझ्यापेक्षा कैक पटीनं सरस होते, त्यांच्या अभिनयाची उंची गाठणं कोणालाही शक्य नाही, अशा शब्दांत नाना पुढे व्यक्त झाले.
या कार्यक्रमात नानांनी धर्म आणि जातीच्या राजकारणावरून डोळ्यांत अंजन घालणारं वक्तव्य केलं. “गडकरी साहेब, तुम्हाला माहितीये का माझी जात काय आहे”, असा थेट सवाल यांनी या कार्यक्रमात केला. मी कधीच कोणाला माझी जात सांगितली नाही आणि मला त्याची गरजही वाटत नाही, असंही ते स्पष्ट म्हणाले.
