हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ
नुसरत फतेह अली खानचं आध्यात्मिक गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. भारतासह पाकिस्तानमध्ये गाण्याचा तेवढाच मोठा चाहता वर्ग. 'मिर्झापूर'मुळे चर्चेत आलं गाणं.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिर्झापूर: द मूव्ही’ सध्या चर्चेत आहे. मात्र चित्रपटाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते अनेक दशकं जुन्या ‘सांसों की माला’ या गाण्याने. पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या दमदार आवाजातील हे गाणं चित्रपटाच्या मिड-क्रेडिट सीक्वेन्समध्ये ऐकायला मिळतं. त्यामुळे प्रेक्षकांना या अजरामर गाण्याची पुन्हा आठवण झाली आहे.
चित्रपटातील नऊ गाण्यांच्या अल्बममध्ये या गाण्याचं आधुनिक रूप सादर करण्यात आलं आहे. नुसरत फतेह अली खान यांच्या मूळ आवाजासोबत मधुर शर्मा आणि वैभव पानी यांच्या मॉडर्न म्युझिकचा वापर करण्यात आला आहे. 31 ऑगस्टला रिलीज झालेलं हे गाणं बीना त्रिपाठी आणि तिच्या एक्स-लव्हरशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रसंगात वाजतं. बीना म्हणते, ‘प्यार ही तो है, जिंदगी भर थोड़ी ही रहता है’, आणि त्याच वेळी पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी प्रेम आणि समर्पण व्यक्त करणारं हे गाणं ऐकू येतं. या गाण्याच्या निवडीचं चाहत्यांनी विशेष कौतुक केलं.
नुसरत यांच्या आवाजाने गाण्याला मिळाली वेगळी ओळख
‘सांसों की माला’चा नुसरत फतेह अली खान यांच्याशी संबंध भारतातील त्यांच्या सुरुवातीच्या दौऱ्यांपासून जोडला जातो. 1979 मध्ये भारताच्या पहिल्या दौऱ्यात राज कपूर यांनी त्यांना ऋषी कपूर यांच्या लग्नात सादरीकरणासाठी आमंत्रित केल्याचं सांगितलं जातं. पुढे नुसरत यांच्या अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये हे गाणं विशेष ठरलं. त्यांच्या दमदार आणि सुंदर गायकीमुळे या रचनेला कव्वालीचा जोश आणि आध्यात्मिक खोली मिळाली.
यानंतर हे गाणं नुसरत यांच्या व्यावसायिक अल्बममध्येही समाविष्ट झालं. 1983 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सची रेकॉर्डिंगही या गाण्याच्या लोकप्रियतेचा महत्त्वाचा भाग ठरली.
प्रत्येक श्वास बनतो प्रिय व्यक्तीच्या नावाची माळ
‘सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम’ या ओळीचा अर्थ अतिशय भावपूर्ण आहे. प्रत्येक श्वास जणू माळेतील एक मणी आहे आणि प्रत्येक मण्यासोबत प्रिय व्यक्तीचं किंवा परमेश्वराचं नाव घेतलं जात आहे. ‘पिया’ हा शब्द प्रियकरासाठीही वापरला जाऊ शकतो आणि ईश्वरासाठीही.
म्हणूनच या गाण्यात लौकिक प्रेम आणि आध्यात्मिक भक्ती यांच्यातील सीमारेषा पुसट होते. हीच त्याची खासियत आहे. कव्वालीच्या मैफलीत ते सूफी रचना म्हणून भावतं, तर श्याम, मोहन, वृंदावन आणि गोकुळच्या उल्लेखामुळे कृष्णभक्तीची अनुभूतीही देतं.
