रणवीरने किमान तेवढं तरी केलं, बरेच जण तेही करत नाहीत..; ‘डॉन 3’ वादात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठिंबा
'डॉन 3' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात प्रसिद्ध अभिनेत्रीने रणवीर सिंहची साथ दिली आहे. तो जाणूनबुजून कोणाला दुखावणारा व्यक्ती नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे रणवीरच्या एका निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं आहे.

फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइज’ने (FWICE) अभिनेता रणवीरविरोधात ‘असहकारा’चे आदेश दिले. या आदेशाचा इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी विरोध केला. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनच्या (CINTAA) अध्यक्षा पूनम ढिल्लो यांनी रणवीरच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ‘डॉन 3’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रणवीरकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र रणवीरने 10 कोटी रुपये देणार असल्याचं मान्य केलं होतं. याला निर्मात्यांनी थेट नकार देत FWICE कडे तक्रार केली होती. “रणवीरने किमान तेवढे तरी पैसे देण्याचा विचार केला, काहीजण तर इतकंसुद्धा करत नाहीत”, अशी प्रतिक्रिया पूनम ढिल्लो यांनी दिली.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला खात्री आहे की तो एक निष्पक्ष व्यक्ती असेल आणि जर त्याला तसं वाटत असेल, तर तो जाणूनबुजून कोणालाही दुखावणारा माणूस नाही. त्याचे एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत मिळून त्याने दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे जर त्याला ‘डॉन 3’ हा चित्रपट करण्यास सोयीस्कर वाटत नसेल, तर त्याची अनेक कारणं असू शकतात. त्याचं कौतुक करायलाच हवं की त्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचं मान्य केलं आणि साइनिंग अमाऊंट परत केली. बरेच जण तर तेही करत नाहीत.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहने एक्सेल एंटरटेन्मेंटला 10 कोटी रुपयांची भरपाई देऊ केली होती, जी त्यांनी स्वीकारली नाही. कारण रणवीर चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे त्यांचं 45 कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं निर्माते म्हणाले होते. यावेळी पूनम यांनी असंही निदर्शनास आणून दिलं की अनेक कारणांमुळे कलाकारांचं चित्रपटातून ऐनवेळी बाहेर पडणं ही एक सामान्य गोष्ट आहे. जर पटकथा दर्जेदार वाटली नाही तर रणवीरने ‘डॉन 3’मधून बाहेर पडून काहीच गैर केलं नाही, असं मत त्यांनी मांडलं.
“पटकथेत अभिनेत्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे, कारण शेवटी त्यांनाच ती कथा सादर करायची असते. जर चित्रपटाला दाद मिळाली नाही, तर शेवटी त्यांनाच टीकेला सामोरं जावं लागेल. त्यामुळे माझ्या मते हे एखाद्या प्रोजेक्टच्या सुधारणेसाठी सकारात्मक पद्धतीनेच असायला हवं”, असा युक्तिवाद पूनम यांनी केला. पण यावेळी त्यांनी निर्मात्यांचं होणारं नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही कलाकारांना दिला.
