हिंदू धर्माचा त्रास असेल तर.., माझ्या प्रत्येक सिनेमात..; ‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी ठणकावून सांगितलं
'देऊळ बंद 2' सिनेमा देवावर आधारित आहे, त्यामुळेच सिनेमाने 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला, असं म्हणत अनेकांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर टीका केली. आता यावर प्रवीण तरडे यांनी देखील ठणकावून सांगितलं आहे...

दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आणि मराठी सिनेविश्वात एक मोठा इतिहास रचला. पण सिनेमाच्या यशानंतर अनेकांनी टीका केली आहे. सिनेमा देवावर आधारित असल्यामुळे यशस्वी झाला… यावर खुद्द प्रवीण तरडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर, ‘माझ्या प्रत्येक सिनेमा हिंदू धर्म आणि देव देवता असतील…’ असं देखील तरडे यांनी ठणकावून सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांना विचारण्यात आलं, ‘अनेकांचं असं म्हणण आहे की, सिनेमा देवावर बनवला आहे म्हणून हिट झालं. ज्यांचं राज्यात मोठं प्रस्थ आहे…’
यावर प्रवीण तरडे म्हणाले, ‘अशा लोकांना मी काय बोलणार… अशा माणसांना काय सांगणार? त्यांना मी माझ्यात पॅटर्ननेच उत्तर देणार ना…, जर मी शांततेत म्हणालो, ‘नाही रे… काही माणसं असतात अशी, त्यांची देखील स्वतःची काही मतं असतील…’ तर ते खरं वाटणार नाही. प्रवीण तरडेला शोभणार नाही. अशा लोकांना झालेला त्रास पाहून मला आनंद मिळतो आणि काम करण्याची प्रेरणा मिळते.’
‘अशाच लोकांमुळे पुढे काय करायचं हे मला कळतं… त्यामुळे त्यांना होत असलेल्या त्रासाचा आपण का विचार करायचा… त्यांना घरी कोणी विचारत नाही म्हणून सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट करत असतात. त्यांच्या घरात किती त्रास असतो. त्यांच्या खासगी अडचणी असतात. म्हणून आपल्याबद्दल बोलून ते मन मोकळं करतात, याचं पुण्य आपल्यालाच लागतं…’
पुढे प्रवीण तरडे म्हणाले, ‘माझ्या प्रत्येक सिनेमात हिंदू धर्म, देव देवता येणार, ज्यांना त्रास व्हायता त्यांना होणार.. मला येणार… पूर्वी बॉलिवूडमध्ये हिंदू देवदेवतांवर टीका करत सिनेमे केलेच ना? भगव्या कपड्यातील लोकांना विचित्र दाखवत सिनेमे केलेच ना? आता आपण आपल्या सिनेमांमधून व्यक्त व्हायचं… आपण आपलं म्हणणं मांडायचं… आता आपण आपल्या मतांवरून मागे हटायचं नाही… आपले मत ठामपणे मांडायचे…’, असं देखील प्रवीण तरडे म्हणाले.
‘देऊळ बंद 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिनेमात अभिनेते मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका म्हणजे स्वामी समर्थांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी साकारलेल्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
