मला घटस्फोटीतच नवरा हवा होता, कारण ते दु:ख..; अपूर्वा नेमळेकरचा खुलासा
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेंटाइन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं. या लग्नाविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. नवरा हा घटस्फोटीतच हवा, अशी तिची लग्नाआधी अट होती.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. दुसरं लग्न करण्यापूर्वी जोडीदार हा घटस्फोटीतच हवा, अशी अपूर्वाची अट होती. यामागचं नेमकं कारण काय होतं, याचा खुलासा तिने या मुलाखतीत केला. त्याचप्रमाणे तिला अभिनयक्षेत्रातील नवराही नको होता.
काय म्हणाली अपूर्वा?
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा म्हणाली, “मी एका गोष्टीवर ठाम होते की मला माझ्या फिल्डचा नवरा नकोय. कारण ज्या पद्धतीने आपण काम करतो, त्याला वेळ नाही, दिवस नाहीये, कुठलेही सणवार नाहीत. या क्षेत्रात मला 15 वर्षे झाली आहेत आणि आता कुठे मला स्टेबल आयुष्य अपेक्षित आहे. मग मला मॅट्रिमोनियल साइट्सशिवाय दुसरे कोणते पर्यायच नव्हते. मी रितसर नाव नोंदवत स्थळं बघू लागले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मी बऱ्याच लोकांशी बोलले आणि भेटले आणि प्रत्येक वेळेला मला हेच वाटायचं की, लग्न करणं खरंच गरजेचं आहे का? एकेदिवशी मी हार मानले आणि म्हटलं आता पुरे झालं.. आता माझ्याने होणार नाही.”
“सर्वांत महत्त्वाचा माझा पहिला विचार होता की, तो मराठी असावा आणि तो डिव्होर्सी (घटस्फोटीत) असावा. ज्यांचं आधी लग्न झालेलं नाही, त्यांनी मला विचारलं नाही, असं नाहीये. मला अशी असंख्य स्थळं आली होती. पण मी ठरवूनच अशा लोकांना भेटत नव्हते. यामागचा एकच विचार होता की ज्या व्यक्तीने त्या दु:खाची चवच घेतली नाही, त्याला ते कळणारच नाही. मला अचानक रडू आलं. मी अचानक कधी भावूक झाले, तर त्याला ते कळणारच नाही. त्याला कदाचित मी वेडी वाटेन. माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. एखादं चॉकलेट पण तनुज त्याचा भाग खाऊन माझ्यासाठी ठेवतो. हे कदाचित लोकांसाठी हास्यास्पद असेल. पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की माझा विचार केला गेला,” अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
View this post on Instagram
याविषयी अपूर्वाने पुढे सांगितलं, “मला हे सर्व मिळालं नव्हतं, मला प्रामाणिकपणा मिळाला नव्हता. त्यामुळे हे सर्व जेव्हा मला मिळतंय, तेव्हा मला रडू येतं. मी तनुजसमोर किती वेळा रडली आहे. गोष्टी खूप कठीण होत्या, पण तनुजला भेटल्यावर मला जाणवलं की आयुष्यात योग्य व्यक्ती येण्यासाठी योग्य वेळच लागते.”
अपूर्वाने 14 फेब्रुवारी 2026 रोजी तनुजशी दुसरं लग्न केलं. ‘आयुष्याने माझी परीक्षा घेतली, अनेक चढउतार अनुभवले, तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही. एवढी वादळं आली तरीही मी खचले नाही’, अशा शब्दांत तिने लग्नानंतरची पोस्ट लिहिली होती.
