शशांक केतकरची लोकप्रिय मालिका 4 वर्षांनंतर घेतेय प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने नुकतेच 1400 भाग पूर्ण केले आहेत. शशांक केतकरची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतंच आठ नव्या मालिकांची घोषणा झाली. वाहिनीवरील काही जुन्या मालिकांची जागा या नवीन आठ मालिका आणि कार्यक्रम घेणार आहेत. अशातच गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिकासुद्धा निरोप घेणार असल्याचं कळतंय. नुकतेच या मालिकेने 1400 भाग पूर्ण केले होते. इतका मोठा पल्ला गाठल्यानंतर आता अचानक ही मालिका बंद होणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून ‘मुरांबा’ आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी ही मालिका सुरू झाली होती. यामध्ये शशांत केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या दोघांनी साकारलेल्या रमा आणि अक्षयच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. म्हणूनच याचे 1400 भाग पूर्ण होऊ शकले. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांना निरोप घेत आहे. अभिनेत्री शिवानी मुंढेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी पोस्ट करत त्यावर ‘वन लास्ट टाइम’ असं लिहिलं आहे. रमा या भूमिकेतले शेवटचे काही क्षण, असंही तिने म्हटलंय.
शिवानी मुंढेकरची पोस्ट-

‘या मालिकेनं 1400 भाग पूर्ण केले आहेत. मनामध्ये खूप संमिश्र भावना आहेत. आम्ही इतका मोठा पल्ला गाठला आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून आम्हाला इतका प्रचंड पाठिंबा मिळाला, म्हणूनच आम्ही इथवर पोहोचू शकलो’, अशा शब्दांत शशांक केतकरने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मुरांबा’ ही मालिका दुपारच्या वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. दुपारच्या वेळेतील ही सर्वांत लोकप्रिय मालिका बनली होती. मध्यंतरीच्या काळात या मालिकेच्या कथानकात ‘लीप’ आला होता. लीपनंतर बदललेल्या कथानकावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं.
‘मुरांबा’ या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकरसह निशाणी बोरूले, सुलेखा तळवलकर, अभिजीत चव्हाण, प्रतिमा कुलकर्णी, मीरा सांग, आरंभी उबाळे, काजल काटे, सिद्धार्थ खिरीड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होईल, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
