दररोज रडले, मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये..; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव
या अभिनेत्रीने वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केलं आणि अठराव्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर जुळ्या मुलांचं संगोपन तिने एकटीनेच केलं. याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत कोमोलिका या विलेनची भूमिका साकारून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घराघरात पोहोचली. उर्वशीला तिच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळालं, परंतु खासगी आयुष्यात तिला बऱ्याच चढउतारांचा सामना करावा लागला. उर्वशीचा अत्यंत कमी वयात घटस्फोट झाला होता. लग्न मोडल्यानंतर तिने जुळ्या मुलांचं संगोपन एकटीनेच केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी सिंगल मदर आहे आणि जुळ्या मुलांचं संगोपन मी एकटीनेच केलंय. नाईलाजाने मला त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावं लागलं होतं”, असं ती म्हणाली.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितलं, “हे सर्व खूप कठीण होतं. मला त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावं लागलं होतं. परंतु हा माझा नाही तर आईचा निर्णय होता. आईनेच मला सांगितलं होतं की, मुलांना तुझ्याकडे सोडून बेशिस्तीचं आयुष्य देण्यापेक्षा त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये शिस्तीचं आयुष्य जगण्याची शिकवण मिळावी. मी मुलांना वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शिस्त लागणार नाही, असं तिचं मत होतं. आजी-आजोबा कधीपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देणार, कारण त्यांचंही वय झालं होतं. तिच्या मताशी मीसुद्धा सहमत झाले. परंतु मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवताना मला फार वाईट वाटत होतं. मी दररोज रडायचे. मुलं घरी नसायची, पण एकेदिवशी मलाही ही गोष्ट जाणवली की मीसुद्धा कामामुळे फार घरी नसायचे.”
View this post on Instagram
“माझ्या आईने घेतलेला तो निर्णय उत्तम होता. कारण माझ्या दोन्ही मुलांना आता खूप चांगली शिस्त लागली आहे. माझा एक मुलगा जेवण बनवतो आणि दुसरा माझ्यासाठी चहा बनवतो. ते घरातली इतर कामंसुद्धा खूप चांगल्याप्रकारे करतात”, अशा शब्दांत उर्वशी व्यक्त झाली. 46 वर्षीय उर्वशीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच लग्न केलं होतं. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता आणि त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षीच तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती एकटीच असून तिने दुसरं लग्न केलं नाही.
