नाटक, वेब सीरिज अन् आता सिनेमा..; ‘कप बशी’मधील ऋषी मनोहरची चर्चा
'दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटक आणि 'पेट पुराण'सारख्या वेब सीरिजनंतर आता अभिनेता ऋषी मनोहर 'कप बशी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर. रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटक आणि ‘पेट पुराण’ सारख्या वेब सीरिजमधून त्याच्या सहज अभिनयाची, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सची आणि पात्रांमध्ये समरस होण्याच्या क्षमतेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
आजच्या स्पर्धात्मक वातावरणात अभिनयाची खोली आणि नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. ऋषी मनोहरमध्ये ही दोन्ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याकडे एका आश्वासक अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे. दरम्यान, येत्या 19 जून रोजी प्रदर्शित होणारा ‘कप बशी’ हा चित्रपट ऋषीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टी नेहमीच नव्या दमदार कलाकाराच्या शोधात असते. त्या शोधात ऋषी मनोहर हा चेहरा अधिकाधिक ठळक होताना दिसत आहे.
‘कप बशी’चा ट्रेलर
View this post on Instagram
रंगभूमीवर घडलेल्या ऋषी मनोहर यांची खासियत म्हणजे प्रत्येक भूमिकेतील भावविश्व अचूकपणे उलगडण्याची त्यांची क्षमता. आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना ऋषी मनोहर सांगतो, “प्रत्येक भूमिका माझ्यासाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसते, तर स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते. अभिनेता म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, अधिक प्रामाणिक आणि अधिक परिणामकारक साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘कप बशी’मधील भूमिका माझ्यासाठी विशेष ठरली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांना माझ्या अभिनयाची एक नवी बाजू अनुभवायला मिळेल, आणि त्या प्रवासाशी ते मनापासून जोडले जातील, अशी आशा आहे.”
दरम्यान आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या एव्हरग्रीन नात्याची ट्विस्टेड गोष्ट ‘कप बशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यामध्ये ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्यासोबतच निर्मिती सावंत, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे, उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
