पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला, 25 सैनिकांचा खात्मा; कुणी घेतली जबाबदारी?

बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानात केलेल्या दुहेरी हल्ल्यात 25 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. बलुचिस्तानमधील जियारत क्रॉस आणि सुराब येथे हे हल्ले झाले. बीएलएने शस्त्रांची लूटही केली. या घटनेने पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळला असून लष्करप्रमुखांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला, 25 सैनिकांचा खात्मा; कुणी घेतली जबाबदारी?
bla pakistan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 10:18 AM

पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानवर दुहेरी हल्ला केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानचे 25 सैनिक मारले गेले आहेत. इतकेच नाही तर बीएलएने पाकिस्तानी सैन्याचे हत्यारेही लुटली आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्यासाठी हा सर्वात मोठा हादरा असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दलाच्या विरोधातील हे दोन वेगवेगळे हल्ले करण्यात आल्याचा दावा बीएलएने केला आहे.

बलोच लिबरेशन आर्मीने 3 सप्टेंबर रोजी हे दुहेरी हल्ले केले आहेत. जियारत क्रॉसच्या जवळ पाकिस्तानी सैन्याच्या एका तुकडीवर पहिला हल्ला करण्यात आल्याचा दावा बीएलएने केला आहे. आमच्या लोकांनी पाकिस्तानी सैन्याचे दोन वाहने नष्ट केली आहेत. या हल्ल्यात 18 सुरक्षाकर्मी मारले गेले. पाच जवान जखमी झाले असून ते पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच आम्ही त्यांचे शस्त्रही लुटली आहेत, असा दावा बीएलएने केला आहे.

जबाबदारी स्वीकारली

दुसरा हल्ला हा सुराबच्या हाजीका परिसरात करण्यात आला आहे. या ठिकाणी एसटीओसने रिमोट कंट्रोल संचलित वाहनामध्ये स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात सात सुरक्षाकर्मी मारले गेले आहेत, असा दावाही बीएलएने केला आहे. जियारत क्रॉसवर झालेल्या हल्ल्यात फतेह स्क्वॉड सामील होती, असं सांगतनाच बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्तानाचा खुलासा नाही

दरम्यान, पाकिस्तानने आपले 25 जवान मारले गेल्याचा आणि मारले न गेल्याचाही अधिकृत खुलासा केलेला नाही. बीएलएच्या दाव्यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत खुलासा केलेला नाही. बीएलएने यापूर्वीही पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दलावर हल्ला केल्याचा आणि त्यात पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता.

बलोचमध्ये हिंसेत वाढ

बलोचिस्तानमध्ये बीएलएकडून गेल्या काही काळापासून पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा दलाच्या विरोधात सशस्त्र अभियान सुरू ठेवलं आहे. ऑगस्ट 2026मध्ये बीएलएने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आठ दिवसात 22 हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 26 जवान मारले गेल्याचा दावा बीएलएने केला होता.

ऑगस्टच्या अखेरीस मस्तुंगजवळ सैन्याच्या एका तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आला होता. त्यात पाकिस्तानचे 13 सैनिक मारले गेल्याचा दावा बीएलएने केला होता. तसेच जुलै 2026मध्ये कोस्ट गार्डवरही आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी मजीद ब्रिगेडने घेतली होती. 30 हून अधिक पॅरामिलिट्री जवानांना मारल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us