चीनच्या नादी लागून बांगलादेश करतोय वाटोळे, थेट भारताला इशारा, गंगा नदीच्या..
बांगलादेशच्या मदतीला भारत कायमच धावून गेला. मात्र, बांगलादेशने पाकिस्तानचे पाय धरल्यापासून भारतानेही सावध भूमिका घेतली. गंगा नदीच्या जल कराराहून भारत आणि बांगलादेश समोरासमोर आहेत. यादरम्यानच भारतावर काही आरोपही केले जात आहेत.

बांगलादेशला कायमच भारताने साथ दिली. ज्या ज्या वेळी बांगलादेश संकटात आला, त्यावेळी भारताने मागचे पुढचे सर्व विसरून बांगलादेशची मदत केली. काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅसचे मोठे संकट बांगलादेशावर होते. त्यावेळी भारताने थेट कोणताही विचार न करता त्यांना गॅस दिला. मात्र, बांगलादेशला काही गोष्टींचा चांगलाच विसर पडल्याचे बघायला मिळतंय. भारताने केलेले उपकार विसरून त्यांनी थेट चीनचे पाय धरले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीस्ता नदीनंतर आता गंगा नदीच्या पाणी वाटपावरून हालचाली वाढल्या आहेत. बांगलादेशातील सत्तारूढ पार्टी बांगलादेश नॅशनल पार्टीने शनिवारी स्पष्ट केले की, भारतासोबच ढाकाचे भविष्य गंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. बांगलादेशाने मागणी केली की, भारताने ताबडतोब गंगा नदीच्या जल करारावर पुढे येऊन चर्चा करावी आणि करार करावा.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 1996 साली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात 30 वर्षांकरिता गंगा नदी जल करार करण्यात आला होता. हा ऐतिहासिक करार 2026 मध्ये संपत आहे. ढाका येथील कार्यक्रमात बोलताना बांगलादेश नॅशनल पार्टीचे महासचिव आणि ग्रामीण विकास मंत्री मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर यांनी म्हटले की, भारतासोबत चांगले संबंध आता गंगा नदीच्या जल करारावर अवलंबून आहेत.
जोपर्यंत हा करार होत नाही, तोपर्यंत भविष्यातील संबंध ठरवणे कठीण आहे. त्यावरच भविष्य आधारित असेल. गंगा नदीचा करार होण्यापूर्वीच मोठ्या धरणाची मंजूरी बांगलादेशने दिली आहे. या धरणाकरिता त्यांनी चीनची मदत मागितली. गंगा नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बांगलादेशला हवे आहे. बांगलादेश भारताविरोधात निर्णय घेताना दिसत आहे. भारताच्या चपाई नवाबगंजच्या रस्त्याने गंगा नदी पुढे बांगलादेशात प्रवेश करते.
गंगा नदीला बांगलादेशात पद्मा नदी म्हटले जाते. गंगा नदीच्या पाण्यावर बांगलादेश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. बांगलादेशात एकूण 54 नद्या अशा आहेत, ज्या भारतातून बांगलादेशात जातात. गंगा नदीवर बांगलादेश धरण बांधत आहे. हे धरण 2033 मध्ये पूर्ण होईल. यादरम्यानच भारतावर काही आरोपही बांगलादेशातून होत आहेत. गंगा नदीच्या पाण्याबद्दल भारताकडून तशी अजून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही.
