भारताला मोठा झटका, नेपाळ हिंदू राष्ट्र करण्याबाबत बालेन शाह यांचं धक्कादायक विधान; हिंसा भडकली तरी…
नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राच्या मागणीवरून हिंसाचार भडकला असताना पंतप्रधान बालेन शाह यांनी धक्कादायक विधान केले आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेमुळे राजेशाही परतण्याची भीती व्यक्त करत, सध्या ही संकल्पना योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. फेडरल व्यवस्थेला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका भारतासाठी चिंताजनक मानली जात आहे.

भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसा भडकली आहे. सुनसरीपासून सुरू झालेली दंगल मधेश प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पसरली आहे. त्यामुळे सरकारने नेपाळ पोलीस आणि नेपाळी सैन्याला अलर्ट केलं आहे. अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यता आली आहे. हिंसा भडकलेली असतानाच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. सरकार पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र स्थापन करण्याच्या बाजूने आहे. आम्ही राजेशाहीचं कोणतंही समर्थन करत नाही, असं बालेन शाह यांनी स्पष्ट केलं आहे. नेपाळ सरकारची ही भूमिका भारतासाठी धक्कादायक असल्याचंही मानलं जात आहे.
बालेन शाह म्हणाले की, हिंदू राष्ट्र स्थापन करण्याबरोबरच राजेशाहीचा मुद्दाही येतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हे योग्य होणार नाही, असं बालेन शाह यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी मधेश केंद्रीत राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत पंतप्रधानांची दोन तास बैठक झाली. यावेळी शाह यांनी फेडरल व्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार आहोत. तसेच आपल्या कार्यकाळात ही व्यवस्था मजबूत करण्याचा संकल्पही करणार आहोत, असंही स्पष्ट केलं.
हिंदू राष्ट्र नकोच, राजेशाही येईल
या बैठकीला जनता समाजवादी पार्टीचे महासचिव रामकुमार शर्मा उपस्थित होते. शर्मा म्हणाले की, पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनवण्याच्या बाजूचे नाहीये. तसं त्यांनी स्पष्ट केलं. तराई/ मधेशमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी वेगळ्या संदर्भाने आहे. तर पहाडी भागात त्याचा अर्थ वेगळा आहे. हिंदू राष्ट्र बनवल्यास राजेशाहीही येईल. त्यामुळेच आम्ही त्याच्या बाजूने नाहीये. त्यामुळे संघीय व्यवस्था कमकुवत होईल, असं पंतप्रधानांचं म्हणणं असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
संकल्पनाच योग्य नाही
आम्ही पंतप्रधानांना त्यांचा हिंदू राष्ट्र बनवण्याच्या बाबतचा दृष्टीकोण विचारला होता. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर देताना हिंदू राष्ट्र ही संकल्पनाच सध्या तरी योग्य नसल्याचं म्हटलं. सरकार संघीय व्यवस्थेच्या बाबत आपली जबाबदारी पूर्णपणे निभावणार आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचं शर्मा यांनी सांगितलं. तर राष्ट्रीय मुक्ती पार्टी नेपाळचे अध्यक्ष राजेंद्र महंतो यांनीही पंतप्रधान हे संघीय लोकशाही व्यवस्थेच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं.
दंगलखोरांवर कारवाई
दरम्यान, नेपाळमध्ये हिंसा सुरू आहे. काही सांप्रादायिक लोक दंगे भडकवत आहेत. आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याविरोधात मिळून एकजुटीने लढावं लागणार आहे, असं सांगतानाच दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
