बकरी ईदवर लष्कर प्रमुख मुनीरने आळवला काश्मीर राग; नियंत्रण रेषेवर येताच म्हणाला काय?

Asim Munir : पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली. बकरी ईदच्या निमित्ताने त्याने नियंत्रण रेषेजवळील लष्करी कॅम्पला भेट दिली. त्याने काश्मीरचा राग पुन्हा आळवला. ऑपरेशन सिंदूरमुळे फटफजिती झाल्याने तो आता उसण अवसान आणत असल्याचे दिसते.

बकरी ईदवर लष्कर प्रमुख मुनीरने आळवला काश्मीर राग; नियंत्रण रेषेवर येताच म्हणाला काय?
जम्मू-काश्मीरवर मुनीर म्हणाला काय?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 08, 2025 | 9:22 AM

पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याने शनिवारी नियंत्रण रेषेवरील चौक्यांना भेट दिली. त्याने सैनिकांशी संवाद साधला. त्याने नियंत्रण रेषेची पाहणी केली. ऑपरेशन सिंदूरमुळे जगात पाकची नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्याचा राग तो काढताना दिसतो. या भेटीत त्याने काश्मीरचा राग आळवला. तर उसण आवसन आणत सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने लष्कराला 24 तास सतर्क राहण्यास सांगितले. पाकचे लष्कर ऑपरेशन सिंदूरमुळे दचकले आहे. भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झालेला आहे. त्यामुळे पाक आता पुन्हा काश्मीरी राग आळवत आहे.

मुनीरने ओकली गरळ

मुनीर हा नियंत्रण रेषेवर पोहचला. त्याने सैनिकांशी संवाद साधला. त्याने आप्तेष्टांपासून इतक्या दूर सीमेवर तैनात असलेल्या जवानांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. देशाविषयी त्यांच्या समर्पण आणि त्यागाला सलाम केला. भारताने जो हल्ला केला, त्यामुळे जे मोठे नुकसान झाले, त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचा कांगावा त्याने केला. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर दौऱ्यावर असतानाच तिकडे मुनीर सुद्धा नियंत्रण रेषेजवळ आला. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत आहे.

काश्मीरचा राग आळवला

नियंत्रण रेषेवर रावळपिंडीच्या कमांडरने त्याचे स्वागत केलं. त्याने सैनिकांसमोर भाषण ठोकले. त्यावेळी त्याने नियंत्रण रेषेवर 24 तास अलर्ट राहण्याचा कानमंत्र सैनिकांना दिला. त्याचवेळी त्याने काश्मीरचा राग आळवला. जम्मू आणि काश्मीर वादाचा निर्णय काश्मिरी लोकांच्या समाधानावर अवलंबून असल्याचे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार त्यावर तोडगा काढावा अशी मागणी त्याने केली. येथील लोकांना निर्णय घेण्याचा जुनाच राग त्याने आळवला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधये तणाव वाढला होता. 7 मे रोजी भल्या पहाटे भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला होता.

त्यानंतर 10 मे रोजी पाकिस्तानच्या युद्धविरामाच्या प्रस्तावानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामांवर सहमती दिली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दोन्ही देशात शांततेसाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. दरम्यान पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी त्यांच्या खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात पाठवून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.