
अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी जगातील अनेक देशांवर कर लादला होता, यात भारताचाही समावेश आहे. भारतावर सुरुवातीला 25 टक्के कर लादला होता, त्यानंतर काही दिवसांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे आणखी 25 टक्के कर वाढवण्यात आला होता. सध्या भारतावर 50 टक्के कर लादलेला आहे. गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराची बोलणी सुरू आहेत. आता लवकरच या करारावर अंतिम स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार 13 जानेवारी रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोर यांनी म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प हे खरे मित्र आहेत. खऱ्या मित्रांमध्ये मतभेद असू शकतात, पण मतभेद नाहीत. ज्या काही समस्या असतील त्या लवकरच सोडवल्या जातील.’ मात्र अमेरिकन काँग्रेसने भारतावर 500% कर लादण्याचा ठराव मंजूर केला होता, मात्र दोन्ही देशांमध्ये करार झाल्यास भारतावर 500 टक्के कर लागणार नाही.
सर्जियो गोर यांनी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना गोर म्हणाले की, भारत-अमेरिका संबंध खऱ्या मैत्रीवर आधारित आहेत. आता दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील पुढील चर्चेची फेरी 13 जानेवारीला होण्याची अपेक्षा आहे. पुढे बोलताना गोर यांनी म्हटले की, ‘टॅरिफ आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांवर मतभेद असूनही, दोन्ही देश सतत संपर्कात आहेत.’ गोर यांच्या या विधानामुळे आता दोन्ही देशांमधील चर्चा लवकरच संपून अंतिम करार होण्याची अपेक्षा आहे.
सर्जियो गोर यांनी पुढील महिन्यात भारताला पॅक्ससिलिकामध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल अशी माहिती दिली. ते म्हणाले की, “आज मी तुम्हाला सर्वांना पॅक्ससिलिका नावाच्या एका नवीन उपक्रमाबद्दल माहिती देऊ इच्छितो, हा उपक्रम अमेरिकेने गेल्या महिन्यात सुरू केला होता. पॅक्ससिलिका ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक धोरणात्मक पुढाकार आहे ज्याचा उद्देश महत्त्वाची खनिजे आणि ऊर्जा स्रोतांपासून ते सेमीकंडक्टर, एआय आणि इतर उत्पादनांची पुरवठा साखळी तयार करणे हे आहे.