रेड झोन वगळता जुलैपासून दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात, निकालाच्या संभाव्य तारखाही ठरल्या

| Updated on: Jun 22, 2020 | 8:43 PM

यात शालेय शिक्षण, दहावी-बारावी निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात (CM Uddhav Thackeray Meeting with Education department) आले.

रेड झोन वगळता जुलैपासून दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात, निकालाच्या संभाव्य तारखाही ठरल्या
Follow us on

मुंबई : “रेड झोनचा अपवाद वगळता जुलै महिन्यापासून नववी, दहावी आणि बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. जुलैमध्ये शाळेचे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची पूर्ण तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच या बैठकीत दहावी-बारावीच्या निकालाबाबतच्या संभाव्य तारखांबाबतही माहिती देण्यात आली. (CM Uddhav Thackeray Meeting with Education department)

नुकतंच शालेय शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शालेय शिक्षण, दहावी-बारावी निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

दहावी-बारावी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु

यंदा मार्च 20 च्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

बारावीचे सर्व पेपर कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार येत्या 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे सांगितले. कोरोना काळात 97 टक्के उत्तरपत्रिका या परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती दिली.

पाठ्यपुस्तक बाजारात उपलब्ध

राज्यातील सर्व शाळांमध्ये प्राथमिक पाठ्य-पुस्तक उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तर नववी, दहावी, बारावीची पाठ्यपुस्तके बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत, अशी माहिती यावेळी शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून अनेक चांगले प्रयोग सुरु आहेत. त्याला प्रतिसाद मिळतोय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेळ मिळावी, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली.

जिओ टीव्हीवर शिक्षणासाठी स्वतंत्र वाहिन्या

शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो, त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी. तसेच तो सहजरित्या ऑफलाईनदेखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नये, त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी, असेही ते यावेळी म्हणाले.

जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र 5 वाहिन्यांचे सुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला 4 ते 5 तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजीटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. येत्या 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार आहे. तर इतरत्र  ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील, असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. (CM Uddhav Thackeray Meeting with Education department)

संबंधित बातम्या : 

HSC, SSC Result | दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

दहावी-बारावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात…..