मनोहर पर्रिकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं रविवारी 17 मार्चला निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासलेलं होतं. रविवारी सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेलं. मनोहर पर्रिकर हे जितके साधे होते, तितकेच चाणाक्ष होते. ते भारताचे […]

मनोहर पर्रिकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी
Follow us on

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं रविवारी 17 मार्चला निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासलेलं होतं. रविवारी सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेलं.

मनोहर पर्रिकर हे जितके साधे होते, तितकेच चाणाक्ष होते. ते भारताचे पहिले आयआयटी झालेले मुख्यमंत्री होते. त्यांनी चारवेळा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्रीही होते. त्यांच्याच कार्यकाळात भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळी सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

 

मनोहर पर्रिकरांच्या आयुष्यातील पाच महत्त्वाच्या गोष्टी

  • 13 डिसेंबर 1955 मध्ये गोव्याच्या मापुसामध्ये जन्मलेले मनोहर पर्रिकर हे असे मुख्यमंत्री होते जे आयआयटीमधून पासआऊट झाले होते.

 

  • मनोहर पर्रिकरांनी 1981 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापिठातून शिक्षण घेतलेल्या मेधा पर्रिकर यांच्याशी प्रेमविवाह केला. मात्र, 2001 मध्ये मेधा यांचे कर्करोगाने निधन झाले.

 

  • गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून ते त्यांच्या मुलांना सर्व सुख-सुविधा देऊ शकत होते. मात्र, त्यांनी असं केलं नाही. त्यांनी फक्त त्यांच्या पगारातून आपल्या मुलांचा सांभाळ केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या शासकीय घरालाही त्यांनी नम्र नकार दिला. स्वत:च्या घरात ते त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे.

 

 

  • मनोहर पर्रिकर हे अनेक महिन्यांपासून आजारी होते, त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्याच्या उपचारासाठी ते अमेरिकेलाही गेले होते. तेथून परतल्यानंतर ते पुन्हा त्याच जोमाने कामाला लागले. त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र, देशासाठी काम करण्याची त्यांचा जोश कायम होता. नाकात ऑक्सिजन नळी असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला. गेल्या रविवारी मांडवी नदीवर बनलेल्या पुलाच्या उद्घाटनालाही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘उरी’ सिनेमाच्या डायलॉगच्या आधारे उपस्थितांना विचारलं, ‘हाऊ इज द जोश’.

 

  • मनोहर पर्रिकर हे 2000 मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, तेव्हा ते मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही. 2002 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यावेळीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च 2012 मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, यावेळी 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आलं आणि पर्रिकरांना संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दोन वर्षांपूर्वी मार्च 2017 ला ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले, मात्र यावेळीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

संबंधित बातम्या :

संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांचे दोन निर्णय, देश कधीही विसरणार नाही!

स्कूटरवरुन प्रवास, टपरीवर चहा, पर्रिकरांबद्दल अभिमानास्पद गोष्टी

IIT शिक्षित पहिले आमदार ते संरक्षणमंत्री, पर्रिकरांचा प्रवास

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड