दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

| Updated on: Apr 05, 2020 | 5:09 PM

रात्री दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने बैठक घेतली आहे (Nitin Raut on light off appeal by PM Modi).

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार
Follow us on

नागपूर : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज (5 एप्रिल) रात्री 9 वाजता घरातील दिवे बंद केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने बैठक घेतली आहे (Nitin Raut on light off appeal by PM Modi). यात त्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद करत उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी रात्री 9 च्या दरम्यान महाराष्ट्रातील विजेची स्थिती सुरळीत राहावी आणि अखंडित वीज पुरवठा राहावा यासाठीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

डॉ. नितीन राऊत यांनी सकाळी 11.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महावितरण, महानिर्मिती, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी तपशीलवार चर्चा केली. ऊर्जा विभागाने केलेल्या तयारीचा वीज कंपनीनिहाय आढावा घेण्यात आला. औष्णिक विद्युत केंद्राचे 5 संच (चंद्रपूर, कोराडी, पारस), कोयना जलाविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र आणि 400 के.व्ही., 765 के.व्ही. पारेषण लाईन्सची उपलब्धतता, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी नितीन राऊत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढवले.

विशेष दिवे बंद करण्याच्या वेळेत रात्री 8.30 ते 9.30 या दरम्यान नितीन राऊत स्वतः नागपूर येथील विद्युत भवनातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून राज्यभरातील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.

ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता

ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही 23 हजार मेगावॅटवरुन 13 हजार मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. 13 हजार मेगावॅट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पावरस्टेशन (Nitin Raut Reaction On Modi) हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात.

मोठ्या प्रमाणात पावर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पावर स्टेशन बंद पडल्यास “मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर” होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एक पावर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 12-16 तास लागू शकतात.

कोरोना विरुद्ध युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown : एकाचवेळी लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये बिघाडाची शक्यता : ऊर्जामंत्री राऊत
देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

Nitin Raut on light off appeal by PM Modi