जन्मानंतर सहा तासात चिमुकलीवरचं मायेचं छत्र हरवलं, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
पुणे : मावळच्या तळेगाव दाभाडे येथील सामान्य रुग्णालयांमध्ये एक धक्कादायक आणि हृदय हेलवून टाकणारी घटना घडली आहे. प्रसूतीनंतर सहा तासातच मातेचा मृत्यू झाला, ज्यामुळे जन्मानंतर सहा तासातच चिमुकलीवरील आईचं छत्र हरवलं आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. याबाबत तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. तळेगाव सामान्य रुग्णालय हे […]
पुणे : मावळच्या तळेगाव दाभाडे येथील सामान्य रुग्णालयांमध्ये एक धक्कादायक आणि हृदय हेलवून टाकणारी घटना घडली आहे. प्रसूतीनंतर सहा तासातच मातेचा मृत्यू झाला, ज्यामुळे जन्मानंतर सहा तासातच चिमुकलीवरील आईचं छत्र हरवलं आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. याबाबत तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.
तळेगाव सामान्य रुग्णालय हे गरीबांसाठी उपयुक्त समजलं जातं. पण या गरीब रुग्णांना जी सेवा मिळायला हवी, ती मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. यामध्ये हे धर्मादाय आयुक्त लक्ष घालत असूनही निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे या संपूर्ण जनरल हॉस्पिटलच्या प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली.
धक्कादायक बाब म्हणजे प्रसूती झाल्यानंतर अवघ्या सहा तासांमध्ये एक इंजेक्शन दिल्यानंतर महिला अस्वस्थ होऊ लागली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी मात्र चुकीचे इंजेक्शन दिलं असल्याची तक्रार करत जनरल हॉस्पिटलच्या प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी केली असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध होत नसल्याची तक्रारहीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता, ज्या डॉक्टरने या पेशंटला हाताळलं, ती डॉक्टर या संपूर्ण परिसरातून गायब असल्याची माहिती देण्यात आली. पण कॅमेऱ्यावर बोलण्यास मात्र नकार देण्यात आला.
पोलिसांनी मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तीन डॉक्टरांची समिती स्थापन करून जो अहवाल येईल येईल त्या अहवालानुसार कारवाई करण्याचं ठरवलं आहे. एकंदरीत या घटनेमुळे चूक कुणाची हे नंतर स्पष्ट होईल, पण आज मात्र या मुलीवर आईचं छत्र हरवलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मात्र संपूर्ण प्रकरणाला प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत काहीवेळ गोंधळही घातला. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला.