‘शिवथाळी’साठी आधारसक्ती, फोटो जुळला तरच जेवण!
शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण असेल.
मुंबई : ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची सक्ती (Shiv thali Aadhar Compulsion) करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा फोटो जुळला, तरच ग्राहकाला दहा रुपयात शिवथाळी मिळणार आहे.
येत्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच 26 जानेवारीपासून राज्यात ‘शिवथाळी’ उपलब्ध होणार आहे. गरजू नागरिकांना दहा रुपयांत भोजन थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र शिवथाळी घेण्यासाठी ग्राहकांना आपले आधारकार्ड सादर करावे लागेल. लाभार्थ्याचा चेहरा आणि आधारकार्डावरील फोटो जुळला, तरच थाळी मिळणार आहे.
दरम्यान, गरीबाला जेवू घालताय, का त्याची थट्टा करताय? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला विचारला आहे. सर्वांना बिनशर्त जेवण मिळालेच पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
10 रुपयात जेवणाची थाली … असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत . आहो गरीबाला जेवू घालताय .. का त्याची थट्टा करताय . आमची मागणी आहे . बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे .#Maharashtravikasaghadi @OfficeofUT
— Ram Kadam (@ramkadam) January 22, 2020
‘बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे.’ असंही ट्वीट राम कदम यांनी केलं आहे.
बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे.
— Ram Kadam (@ramkadam) January 22, 2020
शिवथाळी योजना फेल गेली, लोकांना जेवण देताय की भीक देताय? असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
शिवथाळीमध्ये काय?
शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण असेल. ही जेवणाची थाळी प्रत्येकाला दहा रुपयांना मिळणार आहे. दुपारी 12 ते 2 या दोन तासात शिवथाळी उपलब्ध असेल.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शिवथाळीची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरासाठी दिवसाला 1950 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला 250, ठाण्याला 1350, औरंगाबादला 500, पुण्याला 1000 तर पिंपरी चिंचवडला 500 थाळी मिळणार आहेत.
Shiv thali Aadhar Compulsion