यूजीसीच्या उपाध्यक्षांची हकालपट्टी करा, अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर विद्यार्थी संघटना आक्रमक
महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांनीही आक्रमक होत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली (Student Organizations against Final Exam).
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम परीक्षा होणार की नाही याविषयी सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. मात्र, यूजीसीने सप्टेंबरपर्यंत सर्व परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांनीही आक्रमक होत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली (Student Organizations against Final Exam). यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्यात विविध ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं. तर महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित परीक्षेचा आग्रह धरणाऱ्या यूजीसीच्या उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अनिकेत घुले म्हणाले, “मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. आम्ही देखील राज्यभरात ठिकठिकाणी या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करत आहोत. केंद्र सरकारने तात्काळ कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. आम्ही विद्यार्थी राज्य सरकारच्या भूमिकेसोबत आहोत. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
‘यूजीसीच्या उपाध्यक्षांची हकालपट्टी करा’
दुसरीकडे महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके यांनी देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी परीक्षांचा अट्टाहास धरणाऱ्या यूजीसीच्या उपाध्यक्षांच्या हकालपट्टीची देखील मागणी केली आहे. वैभव एडके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, “आज महाराष्ट्रमध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग होत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. या विषयावर सातत्याने राजकारण होत आह. यूजीसीने जारी केलेल्या गाईडलाईन्स कुठल्याही पद्धतीचे विद्यार्थ्यांच्या हिताच्या नाहीत. हा निर्णय कुठल्यातरी दबावाला बळी पडून घेतल्याचं वाटतं.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची ही स्थिती लक्षात घेऊन तात्काळ राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच परीक्षांचा अट्टाहस धरणाऱ्या यूजीसीचे उपाध्यक्ष यांची हकालपट्टी करावी, अशीही मागणी महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने केली आहे. आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आहे. भारत हा कोरोनाच्या संसर्गात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सोबतच ज्या वेळी संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत होते, त्यावेळी UGC ने परीक्षा रद्द करण्याची सूचना केली. आता संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून परीक्षा घेण्यास सांगितलं जात आहे, असाही आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
हेही वाचा :
वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका
Student Organizations against Final Exam