शाळेत कांदा-लसूण खाण्यावर बंदी, आदित्य ठाकरे भडकले; सत्ताधाऱ्यांना कडक शब्दात सुनावले, म्हणाले…
मिरा-भाईंदरमध्ये एका शाळेत कांदा-लसूण खाण्यावर बंदी घातली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मिरा-भाईंदरमध्ये विद्यार्थ्यांना डब्यात कांदा-लसूण, बटाटा, बीट, कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई केली आहे. या निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी हा लव्ह जिहादवरून भयंकर प्रकार असल्याची टीका केली. संजय राऊत यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही कडक शब्दात सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मराठवाडा असेल किंवा कोल्हापूर असेल. या भागात जैन धर्मीय लोक मिसळून राहतात. तरीही कुठे वाद झालेले नाहीत. एमएमआरमध्ये ठरविक लोक आहेत, ते कांदा-लसूण खाऊ नका, असे सांगत आहेत. जैन धर्म शांततेवर आधारित धर्म आहे. तसे सर्व धर्म असतात. पण कुठल्याही धर्मावर स्वत:च्या धर्माची बंधने लादणे ही हिंसाच आहे. जैन धर्मात अपरिहार्य असतं. परंतु आज मी बघतो की, शाळेचं पाहत आहे की, तुम्ही दुसऱ्यांवर हिंसा करत आहात.
धर्म घरात पाळावा- आदित्य ठाकरे
‘श्रावण संपत आला आहे. आपले आगरी-कोळी बांधव असतात, त्यांनी सांगितलं की, त्यांचं नैवेद्य खायला सांगितल्यास तुम्ही काय कराल. पश्चिम बंगालमध्ये बाहेरून येऊन मासे खाऊ नका, असे सांगितले जात होते. त्यांना कसं पळवलं, हे बघितलं. सगळ्यांनी सगळ्यांचा धर्म घरात पाळावा. दुसऱ्यावर लाद नये. आज त्या शाळेत काही हिंदू असतील. मराठी हिंदू सगळं काही खातोच की. त्यांचा धर्म लादत आहेत. हिंदुत्वावादी सरकार आहे, हिंदुत्वावर आक्रमण होत आहे, त्यांच्यावर काय बोलणार,असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजप नेते काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडू , असा इशारा शिंदे गटाचे अमेय घोले यांनी भाजपला दिला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ते काही महत्वाचे नाहीत. त्यांचं वक्तव्य आम्ही गांभीर्याने का घ्यावे? शिंदे गट त्यांचे गुलाम आहेत. त्यांनी मोठी विधाने करू नयेत’.
