8.38 पर्यंत सगळं ठीक, 8.44 ला विमान कोसळलं… अजित दादांसोबत शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय झालं?
Ajit Pawar Last Call : अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांनी शेवटचा कॉल काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केल्याचे समोर आले आहे. हा कॉल संपल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांनंतर विमान कोसळले.

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळले. अशातच आता अजित पवार यांनी शेवटचा कॉल काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केल्याचे समोर आले आहे. अवघ्या एका मिनिटाच्या कॉलमध्ये हे दोघे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत बोलत होते असे समोर आले आहे. हा कॉल संपल्यानंतर अवघ्या 6 मिनिटांनंतर विमान कोसळल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी 28 जानेवारीला सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी श्रीजीत पवार यांना कॉल केला होता. या दोघांमध्ये 8 वाजून 38 मिनिटांपर्यंत अवघा एक मिनिट बोलणं झालं. त्यानंतर फक्त 6 मिनिटांनी म्हणजे 8 वाजून 44 मिनिटांनी अजित दादांचे विमान कोसळले. याचाच अर्थ 8 वाजून 37 मिनिटांपर्यंत सर्वकाही ठीक होतं. फ्लाईट डेटा रडारनुसार ज्यावेळी हा फोन सुरू होता, त्यावेळी विमान विमानतळाच्या धावपट्टीच्या आसपास होते. पुढील 6 मिनिटांमध्ये विमानाने घिरटी मारली.
विमान कोसळण्यापूर्वी 6 मिनिटे सर्वकाही ठीक होते, शेवटच्या फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित येत आहे, याचा अर्थ 8 वाजून 38 मिनिटांपर्यंत विमानात कुठलाही फॉल्ट नव्हता. कारण तसं काही असतं तर अजित दादा फोनवर बोलले नसते. याचाच अर्थ जे काही घडलं ते शेवटच्या 6 मिनिटांमध्ये झालं किंवा शेवटच्या एका मिनिटात झालं. कारण त्याआधी अजित पवार विमानाबाबत काहीच बोलले नाहीत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की शेवटच्या काही सेकंदांमध्ये विमान एका बाजूला झुकले आणि पुढील काही सेकंदांमध्ये कोसळलं. यानंतर मोठा स्फोट झाला आणि अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
शेवटच्या फोन कॉलमध्ये अजित पवार श्रीजीत पवार यांना काय म्हणाले?
अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.
श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.
अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.
श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित दादांची क्लिप सभेत ऐकवली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत विमानातून केलेला शेवटचा फोन रेकॉर्डिंग खासदार सुनील तटकरे यांनी रायगडच्या इंदापूरच्या सभेत कार्यकर्त्यांना ऐकून दाखवली. तळाशेत गणातील अधिकृत उमेदवार दिशा दीपक जाधव यांच्या प्रचारादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी श्रीजीत पवारांची ऑडिओ क्लिप ऐकवत त्या दिवशीचा प्रसंग सांगितला.
सुनील तटकरे म्हणाले की, ‘दादा 8 वाजून 40 मिनिटांनी विमान तळावर उतरणार होते. ज्या कामासाठी त्यांनी मला थांबवल त्याचा मला निरोप द्यायचा होता. त्यांच्या PA ला मी फोन केला. बोलले साहेब 10 मिनिटांनी उतरतील, मी म्हटलं दादा उतरतील तेव्हा त्यांच्याशी मला फोन लावून द्या. 10 मिनिटांनी त्यांच्या PA चा फोन आला त्यावेळी त्याचां आक्रोश त्याच रडणं मी ऐकलं. 8 वाजून 37 मिनिटांनी दादांनी त्यांचा एका सहकाऱ्याला फोन केला आणि 8 वाजून 44 मिनिटांनी त्यांचा विमानाचं अपघात झाला.’
