
महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी युत्या, आघाड्या दिसल्या. काही ठिकाणी भाजप-शिंदे एकत्र लढले, 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी निवडणूक लढवली. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे आता माहाविकास आघाडीत दिसणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तुमच्यासोबत नसतील का असा सावल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारण्यात आला. मात्र त्यावर थेट उत्तर न देता संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक वेगळाच बॉम्ब फोडला. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ? असा उलट सवालच राऊतांनी विचारला. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवारांसोबत युती करत आहेत. त्यांचं मन कुटुंबाकडे आहे. त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत येईल असं भाकित राऊत यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.
अजित पवार महायुतीत, तरी महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे ना
या पएकंदर मुद्यावर राऊत सविस्तर बोलले. शरद पवार बाहेर पडणार असा का विचार करता. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ? कारण शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार यांचा पक्ष युतीत आहे. तरीही महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे. अशावेळी त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, असं राऊत म्हणाले. आमच्या माहितीनुसार, भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील. अजितदादांना बाहेर पडावं लागेल. दोन दगडावर पाय कसे ठेवणार? काही तरी एक सोडावं लागेल ना? असंही राऊत म्हणाले.
मेलं मेंढरू आगीला भीत नाही
सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद केलेली नाही अशी आठवण भाजपचे नेते अनेकदा करून देत असता, याबद्दल राऊत यांना सवाल विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एका वाक्यात चपखल उत्तर दिलं. “मेलं मेंढरू आगीला भीत नाही” अ,ं राऊत म्हणाले. तुम्ही (भाजप) एकदा अजित पवारांना क्लीनचिट दिलीय ना. स्वत मोदींनी गर्जना केल्यावरही ते सरकारमध्ये आले. कोणत्या तोंडाने डरकाळ्या फोडत आहात? त्या फाईलमध्ये काही आहे की नुसत्या पोकळ डरकाळ्या फोडत आहात? असा सवाल राऊतांनी विचारला.
छगन भुजबळ यांच्या विरोधात किती बोंबा मारल्या. अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. आम्हीही राहिलो. भुजबळ सर्व प्रकरणात निर्दोष झाले. याबद्दल गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित घेतलं पाहिजे. म्हणजे ते निर्दोष आहेत. असं त्यांना वाटतं. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे. तोपर्यंत मनाने तनाने धनाने भाजपसोबत आहेत. जेव्हा सत्ता पालटेल तेव्हा मनाने तनाने धनानं ते आमच्यासोबत असतील असंही राऊत म्हणाले.