समृद्धी महामार्गात 1150 कोटींचा घोटाळ्यात नाव येताच शिंदेंच्या खासदाराचा संताप, म्हणाले माहिती न घेता…

छत्रपती संभाजीनगरमधील ११५० कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावरून अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. १९७१ चा हिबानामा आणि चालकाचा १९८५ चा जन्म या तांत्रिक मुद्द्यावरून भुमरेंनी दानवेंचे आरोप खोडून काढले आहेत.

समृद्धी महामार्गात 1150 कोटींचा घोटाळ्यात नाव येताच शिंदेंच्या खासदाराचा संताप, म्हणाले माहिती न घेता...
Ambadas Danve Sandipan Bhumre
| Updated on: Feb 25, 2026 | 10:57 AM

सध्या महाराष्ट्रातील अनेक घोटाळे समोर येत आहेत. त्यातच आता समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीवरून छत्रपती संभाजीनगरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर ११५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. हिबानामा (बक्षीस पत्र) च्या नावाखाली हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. आता या पार्श्वभूमीवर खासदार संदीपान भुमरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. अंबादास दानवेंनी केलेले आरोप बालिश असल्याचे सांगत त्यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमके प्रकरण काय?

अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी काही कागदपत्रे सादर करत विविध प्रकरणाचा तपशील दिला. जटवाडा शिवारातील गट नं. १० मधील २३ एकर ३० गुंठे जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. या जमिनीचे मूल्य सुमारे ११५० कोटी रुपये इतके प्रचंड आहे. ही जमीन बळकावण्यासाठी खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याच्या नावावर १९७१ मध्ये हिबानामा केल्याचे दाखवण्यात आले आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी सर्वात मोठा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की, ज्या जावेदच्या नावावर १९७१ मध्ये हिबानामा झाला, त्याचा जन्मच १९८५ चा आहे. जन्माच्या १४ वर्षे आधीच त्याच्या नावावर जमीन कशी आली? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या सीआयडी (CID) चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे.

आता यावर खासदार संदीपान भुमरे यांनी या आरोपांनंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन अंबादास दानवेंना सडेतोड उत्तर दिले. जावेद माझा चालक आहे हे मी नाकारत नाही. पण दानवे म्हणतात तो हिबानामा १९७१ चा आहे, तर जावेदचा जन्म १९८४-८५ चा आहे. जो व्यक्ती जन्मालाच आला नव्हता, त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल संदीपान भुमरे यांनी केला आहे.

११५० कोटी हा आकडा आला कुठून?

दानवेंनी आरोप करण्यापूर्वी किमान कागदपत्रांची पडताळणी करायला हवी होती. हिबानामा हा केवळ मुस्लिम कायद्यानुसार होतो. संबंधित जमीन मालक हिंदू महिला असताना मुस्लिम कायद्यानुसार हिबानामा कसा झाला? हा निव्वळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ११५० कोटी हा आकडा आला कुठून? जमिनीचा हा दर कुणी काढला? असा सवाल भुमरे यांनी विचारला आहे.

ज्या महिलेने अर्ज केला त्याला मी आणि माझा चालक ओळखत नाही. शासकीय गैरवापर केला असेल चौकशी करावी आणि कारवाई करावी. अशा पध्दतीने हिबानामा होत असतो का? मी काल कागदपत्रे काढले. 174 गट नंबर अस्तित्वातच नाही. 154 गटाचे वाद सुरू असून, त्याचे पैसे न्यायालयात जमा आहे. त्या गावात गतच 171 पर्यत आहे, मग 174 गट कसा आला? आतापर्यंत मी काही केला नाही, पण आता मी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असेही संदीपान भुमरे यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते गेल्याने त्यांचे संतुलन बिघडले

अंबादास दानवे म्हणतात की अब्रुनुकसानीचा दावा केल्यावर काय होते, मागच्या आरोपावर देखील अब्रुनुकसानीचा दाखल केला आहे. न्यायालयात 27 फेब्रुवारी ही तारीख आहे. माझा चालक दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करावी. सतत मला टार्गेट केले जातात, त्यांना दुसरे काही दिसत नाही. पण हा भुमरे त्याला पुरून उरणार आहे. दानवेंचे संतुलन बिघडले आहे. मी कोणता घोटाळा केला, हे त्यांनी बाहेर काढावे. गैरव्यवहार झालाच नाही. दानवेंकडे काही राहिले नाही, आमदारकी मिळत नाही. विरोधी पक्षनेते गेल्याने त्यांचे संतुलन बिघडले आहे, असा घणाघातही संदीपान भुमरे यांनी केला.

या आरोप-प्रत्यारोपामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. दानवे यांनी भुमरे यांना शासकीय तिजोरीवरचा दरोडा म्हटले आहे, तर भुमरे यांनी दानवेंना सगळीकडे भुमरेच दिसतात असे म्हणत हा केवळ बदनामीचा कट असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणाची खरोखर चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.