‘आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले नाहीत’, अमित शाह यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणितच बदललं आहे. हा बदल घडून आल्यामुळेच राज्यात सत्तांतर घडून आलं. शिवसेना पक्षफुटीवरुन उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपवर सडकून टीका केली जाते. त्यांच्या या टीकेला आता अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडले नाहीत, अमित शाह यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
अमित शाह, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
Chetan Patil | Updated on: Apr 14, 2024 | 6:15 PM

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर आरोप करत आहेत. भाजपवाल्यांनी माझा पक्ष फोडला, असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणतात माझा पक्ष फोडला. मी महाराष्ट्राच्या जनतेला एक स्पष्ट करायला आलो आहे. आम्ही ना शिवसेना फोडली आणि ना राष्ट्रवादी फोडली. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाच्या मोहाने शिवसेना फोडली. शरद पवार यांच्यादेखील पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यात भाषणात केली. महायुतीचे भंडाऱ्याचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भंडाऱ्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसची आज काय अवस्था झाली, आर्धी शिवसेना आणि आर्धी राष्ट्रवादीने पूर्ण काँग्रेसला आर्ध केलं आहे. हे तीन अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकतात का? महाराष्ट्राचं केवळ आणि केवळ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भलं करु शकतात”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेली 10 वर्ष काँग्रेसने खोदलेला खड्डा बुजवण्यातच गेले आहेत. पुढच्या पाच वर्षात महान भारत बनवण्याचं काम होणार आहे. मोदींनी देशाच्या समोर एक संकल्प ठेवला आहे. 2047 मध्ये महान भारताची रचना करणार. भाजप सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरीक कायद्याला लागू करणार. संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. प्रत्येक वृद्ध जो 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे, त्याचा 5 लाखांपर्यंतचा खर्च मोदी सरकार उचलणार असं आम्ही घोषणापत्रात जाहीर केलं आहे”, असं अमित शाह म्हणाले.

‘काँग्रेसने बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न’

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. याच महाराष्ट्राच्या पावन भूमीवर वीर छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, याच भूमीवर जन्म घेतलेल्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान बनवून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं. मी बाबासाहेब आंबेडकर यांना नमस्कार करतो. मी भंडाऱ्यात आलो आहे, बाबासाहेबांचा आज जन्मदिवस आहे. त्यामुळे मी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेऊन घरोघरी जावून मतं मागत आहे. पण 1954 च्या पोटनिवडणुकीत बाबासाहेबांच्या विरोधात लढण्याचं काम याच काँग्रेसने केलं होतं. 1952 असेल, 1954 असेल, बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. याच काँग्रेसने अनेक वर्ष बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us