
अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती, राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटाही जाहीर केला होता. मात्र आता अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक नेत्यांना या अपघाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी तर हा घातापात असल्याचीही शक्यता वर्तवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर कराण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत मोठी मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांनी DGCA ने ब्लॅक बॉक्सचा सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे अशी विनंती केली आहे. आता DGCA अमोस मिटकरींची ही विनंती मान्य करते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
DGCA नी ब्लॅक बॉक्स ची सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे.@DGCAIndia
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2026
अजित पवार यांनी मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी सकाळी आठच्या आसपास उड्डाण केले होते. मात्र 8.45 च्या आसपास लँन्डिंगवेळी विमान क्रॅश झाले होते. विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. त्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला, मात्र या प्रयत्नात विमान धावपट्टीजवळ जमिनीवर आदळले होते. यानंतर विमान आणि विमानातील प्रवाशी जळून खाक झाले होते.
अमोल मिटकरी यांनी आधीही या अपघातावर शंका उपस्थित केली होती. त्यांनी सोशल मीडियावर 5 प्रश्न उपस्थित केले होते. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले होते.