तीच मळमळ… त्याच उलट्या… ठाकरेंच्या आव्हानावर भाजपचा पलटवार, पांचटपणा म्हणत हिणवलं!

Ashish Shelar vs Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आक्रमक भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. याला आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे.

तीच मळमळ... त्याच उलट्या... ठाकरेंच्या आव्हानावर भाजपचा पलटवार, पांचटपणा म्हणत हिणवलं!
shelar vs thackeray
| Updated on: Oct 27, 2025 | 10:34 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईत निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आक्रमक भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना, ‘तुम्ही मुंबईत येऊन गेला. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय दाखवणार नाही. तुम्ही किती आपटायची ती आपटा. डोकं आपटा. कितीही डोकी आपटा. डोकी फुटतील. पण भगवा फुटणार नाही असं म्हणत आव्हान दिले होते. यावर आता भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, ‘केद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबईत येऊन गेले, याची भीती आज निर्धार “मेळाव्याच्या चेहऱ्यावर” स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालीये हे बोलण्यातून सतत डोकावत होते. एवढेच नवीन सोडले तर.. बाकी सगळे तेच ते आणि तेच ते.. तीच रुदाली, तेच रडणे.. तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या.. कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच… नाव “विजयाचा संकल्प” आणि बोलण्याला पराभवाचा दर्प.’

ठाकरेंची शहांवर टीका

आपल्या भाषणात अमित शहांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन. आत बातमी आहे. जिजामाता उद्यानात अॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप. तो येऊन गेला. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही.’

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘भूमिपूजन करायला आला. तरी टीका. फोड ना नारळ. डोक्यावर फोड. नारळ फोडतानाही घराणेशाहीवर टीका. याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं. मेरिटने झालं. आणि घराणेशाही कुणाची ठाकरेंची. अरे उभा राहून दाखव. त्या अब्दालीला सांगायचं. आमच्या आईवडिलांचे ऋण माणणारे पाईक आहोत. तुमची ब्रह्मचार्याची पिल्लावळ आमची घराणेशाही नाही. ब्रह्मचार्याला 40-40 पोरं होती. झाली कशी. तुकारामांचा अभंग आठवला. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेले. तशीच भाजपची परिस्थिती आहे.