भोंदू अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत, नावासह कोणाचे किती कॉल? अंजली दमानियांनी सर्वच सांगितलं
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बड्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अशोक खरात याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. या सर्वांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी विविध फोटो पोस्ट करत मोठमोठे खुलासे केले आहेत. अशोक खरातला जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शेकडो वेळा दूरध्वनीवरून संवाद साधला, असे कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अशोक खरातांना ज्यांनी मदत केली याची माहिती समोर आणणं फार गरजेचे आहे. यात एक जिल्हाधिकारी आहेत ज्यांनी त्यांना खूप मदत केली होती. ते मुंबईत कार्यरत आहेत. आता मी त्यांचे नाव घेऊन सांगते अभिजीत भांडे पाटील असे त्यांचे नाव असून ते एसआरएमध्ये होते. त्यांची एसआरएमधूनही पदमुक्त करुन त्यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी आणलं आहे. यांना खरतर पदमुक्त करणे गरजेचे आहे. त्यांना काढून टाकणं गरजेचे आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे
अभिजिती भांडे पाटील हे केसरकर आणि अशोक खरात यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांचे दोन फोन आहे. एका फोनवरुन त्यांनी खरातांशी १४३ वेळा संभाषण केले. दुसऱ्या फोनवरुन ५३ वेळा त्यांनी फोन केला आहे. आतापर्यंत मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार कल्पना खरात, हर्षवर्धन खरात, तृप्ती खरात, सृष्टी खरात हे जे फरार आहेत. त्यात कल्पना आणि हर्षवर्धन हे फरार आहे. त्या दोन्ही मुलींबद्दल मला काही माहिती नाही. पण हे दोघे जण जे फरार आहेत, त्यांनी आता कुठेतरी यांनी सरंक्षण दिले आहे. म्हणून मी सायटीला विनंती करते की यांना तात्काळ डिटेन करण्यात यावे. कारण सर्व ठिकाणाहून खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे आहे, असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला.
हे लोक खरातांना फोन का करायचे?
दिपक लोंढे हे जवळचे होते. हे केसरकरांच्याही जवळचे आहे. त्यांचे १८९ कॉल आहेत. बाळासाहेब बोराडे यांचे १५६ कॉल आहेत. नंदकिशोर काठोरे हे डॉक्टर आहेत. १०६ कॉल आहेत. त्यांचा रोल बोलता येत नाही. पण विचित्र रोल आहे. सचिन सुंबाळे १७७ कॉल्स आहेत. मंगेश नव्हाळे ११० कॉल्स आहे. राहुल देशमुख, अविनाश पोटे, महेंद्र शेळके पाटील यांचाही रोल तपासला पाहिजे, असा खुलासा अंजली दमानिया यांनी केला.
धक्कादायक बाब म्हणजे जवळजवळ तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पीआय आणि एपीआय असे सात अधिकारी, दोन आरटीओ त्यात निमसे नावाचा व्यक्ती आहे. हे लोक खरातांना फोन का करायचे. शेकडो कॉल का केले, असा सवालही केला आहे.
