41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण, ग्रंथप्रदर्शन व विक्रीकरिता स्टॉलची नोंदणी सुरू
कोरोनाचा प्रसार आणि महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाचे नियम पाळूनच हे संमेलन घेण्यात येईल, अशी ग्वाही लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. या 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील.
औरंगाबाद: आगामी 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे (Marathwada Sahitya Sammelan logo) अनावरण नुकतेच औरंगाबादनगरीत झाले. लोकसंवाद फाउंडेशनतर्फे येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंवाद फाउंडेशन (Loksanvad Foundation) आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवारी या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. हा सोहळा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधार रसाळ यांच्या हस्ते पार पडला.
संमेलनासाठी प्राध्यापकांचा पुढाकार
औरंगाबाद येथील लोकसंवाद फाउंडेशनतर्फे हे संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेत बहुतांश सदस्य प्राध्यापक आहेत. त्यांनीच मराठवाडा साहित्य परिषदेकडे औरंगाबादमध्ये संमेलन भरवण्यासाठी विनंती केली. ही विनंती मसापने स्वीकारली आणि त्यापुढील प्रक्रियेला सुरुवात झाली.
प्राध्यापकांमुळे संमेलन यशस्वी होईल- डॉ. रसाळ
41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करते वेळी ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ म्हणाले की, “संमेलनाचे आयोजन करण्यासाठी प्राध्यापक मंडळी पुढे आली आहेत. दोन वर्षांपासून हा साहित्यविषयक कार्यक्रम थांबवा होता. मात्र औरंगाबादच्या संमेलनापासून या चळवळीला पुन्हा गती मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजन समितीत सर्व बौद्धिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असल्यामुळे हे संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास आहे.”
बोधचिन्हावर मराठवाड्याचा सांस्कृतिक वारसा
लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आगामी मराठवाडा साहित्य संमेलनासाठीच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळच्या कार्यक्रमात बोलताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे म्हणाले, संमेलनाच्या बोधचिन्हाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.” या कार्यक्रमात संमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, सहकार्यवाह डॉ. दणेश मोहिते हेदेखील उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार
कोरोनाचा प्रसार आणि महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाचे नियम पाळूनच हे संमेलन घेण्यात येईल, अशी ग्वाही लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. तसेच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील. यापूर्वीचे 40 वे मराठवाडा साहित्य संमेलन जालन्यात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद दत्ता भगत यांनी भूषवले होते.
ग्रंथप्रदर्शनासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाकरिता ग्रंथ प्रदर्शनासाठीच्या स्टॉलचा दर 2000 रुपये एवढा ठेवण्यात आला आहे. स्टॉलची साइज 8 बाय 10 फूट असून स्टॉलमधील एका कर्मचाऱ्याला दोन दिवस नाश्ता, भोजन व निवासाची व्यवस्था केली जाईल. एका संस्थेसाठी एकच स्टॉल दिला जाईल. प्रथम नोंदणी करणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. तसेच संमेलनात स्टॉल नोंदणीसाठी – 9175274500 किंवा 8888377499 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (41th Marathwada Sahitya Sammelan logo released in Aurangabad, Marathwada, Maharashtra)
इतर बातम्या-
औरंगाबादेत भरणार साहित्यिकांचा मेळा, 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 आणि 26 सप्टेंबर रोजी