विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा अर्ज, भाजपचे संजय केणेकर यांना आव्हान
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, हे निश्चित, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

मुंबईः काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या 29 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव याचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सातव यांनी हा अर्ज दाखल केला.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू- नाना पटोले
दिवंगत शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, हे निश्चित, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
भाजपकडून संजय केणेकरांची उमेदवारी
दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी काल भाजपकडून संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी हा अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेचे पक्ष नेते प्रविण दरेकर आदी उपस्थित होते. त्यामुळे विधन परिषदेच्या या पोटनिवडणुकीत केणेकर विरुद्ध प्रज्ञा सातव असा सामना होईल. 29 नोव्हेंबर रोजी यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 16 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती.
इतर बातम्या-
