शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे वातावरण तापलं, काँग्रेसची प्रतिक्रिया, थोरात म्हणाले…
विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यावर आता बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगावर आरोप सुरूच आहेत. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले थोरात?
अलीकडच्या काळातला निवडणुका खूप संशयास्पद होत आहेत, त्यामुळे हे नाकारता येणार नाही. अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. राहुल गांधींनी जे मांडलं त्याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही. हरियाणा पुन्हा भाजपकडे जातं, हे कसं होऊ शकतं? शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत, शंकांचं निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील, तर ईव्हीएमसंदर्भातही प्रश्न निर्माण होतो. मतदानावर लोकशाही चालते, त्या मतदानावरच शंका निर्माण होत असेल तर ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणं, अत्यंत गरजेचं आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्व दूर जनतेच्या मनात आहे, असं यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून देखील जोरदार समाचार घेण्यात आला आहे. शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबुडाचा आहे. तथ्यहीन आहे, या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
