AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | पंकजा मुंडे सर्वात जास्त आक्रमक, अमित शाह यांना भेटणार, गोपीनाथ गडावर मोठी घोषणा

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यातिथी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं.

BIG BREAKING | पंकजा मुंडे सर्वात जास्त आक्रमक, अमित शाह यांना भेटणार, गोपीनाथ गडावर मोठी घोषणा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 03, 2023 | 4:09 PM
Share

बीड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झालेल्या बघायला मिलाल्या. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली. पण आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आता आपण आपल्या नेत्याशी चर्चा करणार, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मी अमित शहा यांची भेट घेणार आहे.  अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं पंकजा म्हणाल्या.

“माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणासमोरही झुकणार नाही”, असंदेखील पंकजा यावेळी म्हणाल्या.

“मला पहिल्या पाच वर्षाच्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार अनोखे आहेत. मी आज माझ्या पित्याच्या पुण्यस्मरणामध्ये त्यांच्या आठवणी, अश्रू दाबून आलेल्या नेत्यांचे मनात आभार मानून मी बोलायचा प्रयत्न करते. पण मी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनामध्ये जर सतत विचार केला की, माझ्या बोलण्याचे नेमके काय अर्थ निघतील? तर गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण मी करु शकणार नाही. ज्यादिवशी मी समोरच्या माणासाला आवडेल ते बोलणार नाही त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभं राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आज मीडिया फार माझ्या मागे आहेत. मी त्यांचे आभार मानते. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. कारण माझं म्हणणं त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवलं. माझ्या माणसापर्यंत ते बरोबर पोहोचलं. त्यामुळे त्यांना आज वाटतंय की, ताई काय बोलणार”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.

‘माझे शब्द लेचेपेचे नाहीत’

“मी अनेकवेळा माझी भूमिका मांडली आहे. ती भूमिका मी परत मांडावी एवढे लेचेपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. जसा रामाने बाण सोडला तर तो परत येत नसतो. तसा गेलेला शब्द परत फिरवायची वेळ येऊ नये. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे, त्यामध्ये माझे पिता गोपीनाथ मुंडे विसावले आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आयुष्यात कधीच सत्तेचं स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षामध्ये माझ्या पित्याने राजकारणाला सुरुवात केली. सत्तेच्या शिखरापर्यंत पक्षाला पोहोचवण्याचं ज्यांचं योगदान आहे त्या गोपीनाथ मुंडे यांची मी कन्या आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“भगवान गडावर गोपीनाथ मुंडे शेवटचं आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, मला भगवान गडावरुन पंकजा दिसते. हे माझं प्रमोशन करण्यासाठी नव्हतं. पंकजाची काळजी घ्या म्हटल्यावर त्यांना फक्त माझी काळजी आहे, असं नव्हतं. त्यांना म्हणायचं होतं की, तुम्ही फक्त पंकजाची काळजी घ्या, पंकजा सगळ्या गोष्टींची काळजी घेईल. कारण मला माहिती आहे माझं आणि माझ्या बाबांचं नातं काय होतं”, असं पंकजा म्हणाल्या.

‘त्यांना इशारा मिळतच असतो’

“गोपीनाथ मुंडे यांचं एक वाक्य कानात नेहमी गुंजत राहतं, ते म्हणजे मी थकणार नाही, थांबणार नाही, कुणासमोरही झुकणार नाही. हे वाक्य कितीही बोललं तरी त्याचं महत्त्व कमी होणार नाही. गोपीनाथ मुंडे हे तुमच्यासाठी या वाक्याचा उच्चार करायचे. ते कुणाला धमकावण्यासाठी, सांगण्यासाठी, कुणाला इशारा देण्यासाठी करण्याची गरज नाही, ज्याला इशारा मिळायचाय त्याला मिळतच असतो”, असं मोठं वक्तव्य पंकजा यांनी यावेळी केलं.

“माध्यमांमध्ये, सगळीकडे सारखं हेच चाललंय, पंकजा मुंडे यांनी काहीही बोललं, त्या बोलण्याचे नंतर पोस्टमार्टम. मी त्यांना दोष देत नाहीय. दोष त्यांचा नाहीय. परिस्थिती जी झालीय त्याचा दोष आहे. कारण गेल्या पाच वर्षात ज्या भूमिका घडल्या आहेत, गेल्या पाच वर्षात प्रत्येक पक्षाने ज्या राजकीय भूमिका घेतल्या आहेत, माझ्या पक्षासकट, त्यामुळे प्रत्येक वाक्य कुणाकुणाला लागू पडतंय”, असं पंकजा म्हणाल्या.

“मी राजकारणात केवळ लोकांसाठी आहे. मी माझ्या परिवाराचं भलं करण्यासाठी नाही. मी माझ्या स्वत:च्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकारणात नाही. मी लोकांसाठी आहे. लोकं म्हणजे फक्त माझ्या आजूबाजूला राहणारे कार्यकर्ते किंवा मला रोज भेटणार आहेत ते नाहीत. तर जो शेवटचा माणूस आहे, जो माझ्याकडे पाहतोय, मला तो दिसत नसला तरी त्याचं हित मला दिसतंय. त्याच्यासाठी माझी भूमिका असणार. ती भूमिका बजावताना मला असं वाटलं की मी ज्यांच्याबरोबर काम करतेय त्यांच्यापेक्षा वेगळी आहे तर ती व्यक्त करण्याचे संस्कार मला गोपीनाथ मुंडे यांनी दिले आहेत”, असं पंकजा म्हणाल्या.

“गोपीनाथ मुंडे यांनी वंचितांच्या हितासाठी नेहमी पुढची दिशा मांडली. मराठा आरक्षणाला भगवान गडावरुन संभाजीराजेंना घेऊन पाठिंबा देणारा बहाद्दर आपला गोपीनाथ मुंडेच आहेत. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नका, असं सुद्धा मुंडे साहेबांनी सांगितलं. भूमिका या समाज हिताच्या घ्यायच्या असतात. कुणाला आवडेल त्या भूमिका घेणाऱ्या व्यक्ती एखाद्यावेळी आमदारकी, खासदारकी, राज्यंत्री, मंत्रिपद मिळवू शकतो. पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाहीच. मला परळीतून पराभव स्वीकारावा लागला. मला सहज काही मिळालेलं नाही”, असंही त्या म्हणाल्या.

‘माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की…’

“माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला बोलवेल आणि तुमच्यासमोर भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालणारे खांदे अजून मला मिळालेले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना विसावू देणार नाही”, असं पंकजा म्हणाल्या.

‘4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर…’

पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोकं निवडणुका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दाट विश्वास आहे, असं पंकजा म्हणाल्या.

माझा नेता अमित शाह आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांचा वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे. कारण माझे वडील आता जीवंत नाहीयत. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडलाय. मी त्यांच्याशी बोलणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझे हिचिंतक खूप आहे. सगळेच आहेत. सगळ्याच पक्षात आहेत. आतापर्यंत जे बोलले त्यांचे मी आभार मानते. मी रडगाणे गाणारी नाही. मला आज तुमच्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगायचं आहे, तुमचं प्रेम, दिशा आणि दशा हेच माझं राजकारण ठरणार आहे, असं पंकजा म्हणाल्या.

आता चार वर्ष झाले मी आमदारकीची निवडणूक हरले. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ते माझी चिंता करतात. ज्यांना वाटतं पंकजामध्ये गुण आहेत त्यांना पंकजाने आपल्याजवळ असलं पाहिजे, असं वाटतं. मी त्यांचा सन्मानच करते. ज्यांना संधी चालून येते ते संयमाने वागण्याचा सल्ला देतात. माझ्या जीवनात संयमाशिवाय काहीच महत्त्वाचं नाही. एवढा संयम मी माझ्या आयुष्यात ठेवला, असंही पंकजा म्हणाल्या.

माझ्या चेहऱ्याकडे बघा. कुठे नाराजी दिसते का? माझा बाप एवढा मोठा राहिला. त्यांच्यापेक्षा मोठं कुणी असेल तर अपेक्षा करेन, मी लहान माणसांकडे काय अपेक्षा करु? माझी कुणाकडे अपेक्षा नाही. फक्त तुमच्याकडे अपेक्षा आहे. तुम्ही विश्वास ठेवा, असं आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...