राष्ट्रवादी युवक काँग्रेसला संभाजीनगर नावाची घाई, नाशिकमध्येही ‘ते’ नाव काढायला सरसावले
शहरांचे नामकरण झाले असले तरी नवीन आडगाव नाका येथे फलक न लागल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने फलक लावले आहे. सत्ताधारी पक्षाला मागे टाकत हा निर्णय घेतल्याने जोरदार चर्चा होत आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील दोन शहरांचे नाव बदलण्यात आले होते. त्यामध्ये औरंगाबाद ( Aurangabad ) शहराचे नाव करून छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) करण्यात आले होते. त्यानंतर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले होते. मात्र केंद्र शासनाने परवानगी न दिल्याने नामकरण अधिकृत मानले जात नव्हते. त्यामुळे नामकरणाच्या संदर्भात काहीसा संभ्रमच होता. तरीही त्यापूर्वी बऱ्याच पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी फलक बदलले होते. मात्र प्रशासकीय मान्यता नसल्याने फलक काढून घेण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्रानेही परवानगी दिल्याने सत्ताधारी पक्षांच्या आधीच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या ( NCP ) वतीने छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरातून छत्रपती संभाजीनगर रोडची सुरुवात होते तिथे फलक लावण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर रोड असा फलक लावण्यात आला असून त्याखाली सौजन्य म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस असा उल्लेख करण्यात आला आहे.
खरंतर औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे यासाठी अनेक नेत्यांनी यापूर्वी मागणी केली होती. त्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी ही मागणी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने याबाबत नामकरण करण्यास मंजूरी दिली होती.
त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीसरकारचा निर्णय रद्द करून नव्याने नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर केंद्राकडे नामकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर नामकरणाला मंजूरी देण्यात आली.
त्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी औरंगाबाद आणि उस्मानाबाद नाव बदलून नव्या नावाचे फलक लावण्यात येत आहे. मात्र, बराच कालावधी उलटला तरी देखील नाशिक मधील रस्त्यावर दिशा फलकाचे नावात बदल न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजी नगर रोड असे दिशा फलक लावले असून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून महाविकास आघाडी सरकारने यबाबत पाठपुरावा केल्याचे म्हंटले आहे.
औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादच धाराशिव असं नामांतर झालं. मात्र, नाशिक शहरात अजूनही औरंगाबाद रोड असे संबोधले जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नविन आडगाव नाका येथे छत्रपती संभाजी नगर रोड असे दिशा फलक लावले आहे.