दीड वर्षात प्रदर्शनं बंद, छायाचित्रकार ठाकरेंचा ‘फोकस’ चित्रकार, शिल्पकारांकडे का वळला नाही ? आशिष शेलार यांचा सवाल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा "फोकस" का नाही वळला असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. तसेच शासनाने चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा “फोकस” का नाही वळला असा सवाल भाजपा नेते तथा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. तसेच शासनाने चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.
दीड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत
राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. “राज्यात सुमारे 10 हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोनाकाळात गेल्या दीड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती,” असे शेलार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा उपेक्षित घटकाकडे फोकस वळला नाही
तसेच पुढे बोलताना कर्नाटक, चंदिगडसारख्या राज्यांनी आपापल्या राज्यातील कलावंताना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत. पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही. याचीच आठवण करुन देण्यासाठी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. या कलावंताना सरकारने मदत करावी अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली, असे शेलार म्हणाले.
दारू आणि गुत्थ्यांवर वसुलीत अधिकारी लावले जातात
तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवर टीका केली. ज्याचा जावई अमली पदार्थाच्या गुन्ह्यात पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्थ्यांवर वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्थ्यावर वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असा आरोपही शेलार यांनी केला.
मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही
तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. ‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही. यंत्रणांना काम करु द्यायचे नाही. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही. हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही, असेदेखील आशिष शेलार म्हणाले.
इतर बातम्या :
पेट्रोलच्या दरवाढीने जनता हैराण, रामदेवबाबांचं एकच वाक्य, म्हणाले हे स्वप्न…
Video | ना लाल माती, ना फड, पण लहानग्यांची कुस्ती जबरदस्त, मजेदार व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/3XyNeobsf0#ViralVideo | #Viral | #wrestling |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
(bjp leader ashish shelar criticizes uddhav thackeray demand help to photographer)