लव्ह जिहाद होत असेल तर…अनिल बोंडे यांच्या मागणीने खळबळ; म्हणाले कायदा असा करा की…
लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे, असा दावा करत अनिल बोंडे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतर हे राज्याच्या परवानगीनेच झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली.

Love Jihad : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक प्रेम प्रकरण समोर आले आहे. या प्रेमपकरणात मी माझ्या मर्जीने संबंधित मुलासोबत गेले आहे, असं मुलीकडून सांगितलं आहे. परंतु तरीदेखील या प्रकरणाला लव्ह जिहादचा संदर्भ जोडला जात असून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे, असे दावा मुलीच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले आहे. असे असतानाच आता भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
काय म्हणाले अनिल बोंडे?
लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे. अहमदनगरमधील घटना अपवादात्मक नाही. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी राज्यसभेत खाजगी विधेयक आणले आहे. एक मुलगा तसेच त्याचे संपूर्ण कुटुंबीय खोट्या ओळखीच्या माध्यमातून मुलींना फसवतात. प्रेमाच्या जाळ्यात ओढून ड्रग्सच्या मदतीने, प्रलोभन देऊन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं जातं. मुस्लिमांची संख्या वाढते आहे. हिंदूंची संख्या कमी होते आहे. मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी विशेषता मुलींना टार्गेट केलं जात आहे, असा मोठा आरोप अनिल बोंडे यांनी केला.
भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं
छागुर बाबा बाबा प्रकरणात ईडीन शंभर कोटी रुपये जप्त केले. छागुर बाबाने बाबा असल्याचे दाखवत त्याच्या PA, ड्रायव्हरच्या मुलीपासून ते तिथे येणाऱ्या भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं. हे जाळं संपूर्ण देशभर होतं. अमरावती बडनेरा लव्ह जिहादच हब झालेले आहे. मेळघाटातील आदिवासी मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या चांगल्या घरच्या मुली यांना या जाळ्यात फसवलं जातं, असाही दावा अनिल बोंडे यांनी केला.
धर्मांतर होत असेल तर…
आंतरधर्मीय विवाह केला जात असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट करून मुलींच्या पालकांना याबाबत कळवलं पाहिजे. मुलगी सज्ञान असली तरी स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे. राज्य शासनाला सांगूनच धर्मांतर झालं पाहिजे, अशी मोठी मागणीही बोंडे यांनी केली.
दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे
खोटी ओळख देऊन प्रलोभन देत ब्लॅकमेलिंग करून विवाह होत असतील आणि मॅरेज बिरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल दोषी आढळल्यास किमान दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तेव्हाच लव्ह जिहादचे प्रकार थांबू शकतील, असे मत बोंडे यांनी व्यक्त केले.
