
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर जर निकालांचा भौगोलिक नकाशा पाहिला, तर एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते. हिंदुत्वाचा प्रभाव मुंबईत सर्वत्र समान नव्हता, पण तो निर्णायक ठिकाणी अत्यंत प्रभावी ठरला. विशेषतः पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या दोन भागांत नितेश राणेंच्या प्रचाराचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने दिसून आला.
निवडणूकीच्या आधी काळात मुंबई ही एकसंध राजकीय घटक म्हणून चर्चेत होती, मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शहर दोन वेगळ्या मानसशास्त्रीय पट्ट्यांत विभागलेलं दिसलं. या दोन्ही पट्ट्यांत नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचाराचा परिणाम पहायला मिळाला. पूर्व उपनगरांतील घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, कुर्ला (हिंदूबहुल भाग), तसेच मानखुर्दच्या काही भागांत ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांवर लढली गेली नाही तर येथे नितेश राणेंची आक्रमक हिंदुत्वाची भाषा प्रभावी ठरले. या भागात स्थलांतर, झोपडपट्ट्या, अतिक्रमण, कायदा-सुव्यवस्था आणि धार्मिक-सांस्कृतिक असुरक्षितता हे मुद्देही चर्चेत होते.
पूर्व उपनगरातील राणे यांच्या सभांनंतर प्रचाराचा सूर बदललेला दिसला. संरक्षण, ओळख आणि शक्ती यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचला. याचा परिणाम असा झाला की या भागात भाजप उमेदवारांच्या विजयाचा दर अधिक सुसंगत आणि सलग दिसतो. येथे हिंदुत्व हे केवळ भावनिक नव्हे, तर दैनंदिन सुरक्षिततेशी जोडलेलं राजकारण बनलं. याता परिणाम थेट निकालात पहायला मिळाला.
पश्चिम उपनगरात मात्र चित्र काहीसे वेगळे होते. बोरिवली, कांदिवली, मलाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या भागांमध्ये मध्यमवर्गीय, व्यापारी, सेवा क्षेत्रातील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. येथे निवडणूक निर्णयांवर सोशल मीडिया, राष्ट्रीय राजकारण आणि मोठ्या फ्रेमचा प्रभाव जास्त असतो. नितेश राणेंच्या वक्तव्यांनी या मतदारांमध्ये थेट भावनिक प्रतिक्रिया निर्माण केली नाही, पण ध्रुवीकरणाचा स्पष्ट फायदा भाजपला झाला.
पश्चिम उपनगरांत हिंदुत्व हे संघर्ष म्हणून नव्हे, तर ओळखीची खात्री म्हणून काम करताना दिसलं. कोणत्या बाजूने उभं राहायचं, याचा स्पष्ट सिग्नल मतदारांना मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे, दादर–परळ–लालबागसारख्या पारंपरिक मराठी पट्ट्यांत शिवसेना ठाकरे गटाचा मराठी अस्मितेचा मुद्दा सुरुवातीला प्रभावी वाटत होता. मात्र या निवडणुकीत हा मुद्दा परिचित आणि पुनरावृत्तीचा ठरू लागला. त्यामुळे या भागात मतांचे पूर्ण ध्रुवीकरण न होता, हिंदुत्व विरुद्ध मराठी अस्मिता असा अंतर्गत संघर्ष दिसून आला, यात ज्यात भाजपाला अप्रत्यक्ष फायदा झाला.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास एक स्पष्ट निष्कर्ष समोर येतो. पूर्व उपनगरात नितेश राणेंचे हिंदुत्व हे सक्रिय ऊर्जा बनलं, तर पश्चिम उपनगरांत ते निर्णयाची दिशा ठरलं. दोन्ही ठिकाणी परिणाम वेगळा असला, तरी निकालांच्या दृष्टीने तो भाजपसाठी अनुकूल ठरला. या निवडणुकीत मराठी अस्मिता पूर्णपणे नाहीशी झाली असं नाही, पण ती निर्णायक घटक राहिली नाही. मराठी अस्मिता एका सांस्कृतिक आठवणीपुरती सीमित राहिली, तर हिंदुत्व हे सध्याच्या असुरक्षितता, राष्ट्रीय राजकारण आणि शक्तीच्या भाषेशी जोडले गेलं.
ठाकरे गटाचे मराठी–अमराठी आणि अदानी फिअर फॅक्टर हे मुद्दे वातावरण तापवण्यात यशस्वी झाले, मात्र मतदारांवर त्यांचा फारसा प्रभाव झाला नाही. निवडणूकी नंतरचा एकत्रित आढावा सांगतो की, मुंबईत भाजपची सत्ता येण्यामागे हिंदुत्वाचा भौगोलिकदृष्ट्या अचूक वापर हा महत्त्वाचा घटक ठरला. पूर्व उपनगरांत तो थेट विजयात दिसला, तर पश्चिम उपनगरांत स्थिर, शिस्तबद्ध मतदानातून समोर आले. याचाच अर्थ नितेश राणेंचे हिंदुत्व हे मुंबईत सर्वत्र एकसारखे लागू झाले नाही, पण जिथे जिथे ते लागू झाले, तिथे निवडणूक निकालाची दिशा बदलणारे ठरले. हेच या महापालिका निवडणुकीच्या निकालातील सर्वात महत्त्वाचं राजकीय निरीक्षण आहे.