रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती; भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती करण्यात आली आहे, मराठी बोलता येत नेसल तर एक मे पासून परवाने निलंबित होणार आहेत, यावर आता भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. जे रिक्षाचालक मराठी बोलू शकणार नाहीत, त्यांचे वाहन परवाने एक मे नंतर थेट रद्द करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच सरकारमध्ये देखील या निर्णयावरून दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. काही नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे, तर काही जाणांकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
प्रचंड प्रमाणात हा वर्ग आहे. जो महाराष्ट्रातला नाही. दुर्दैवाने टॅक्सी रिक्षा चालवणारे अजूनपर्यंत मराठी शिकलेले नाहीत. या लोकांना आता मराठी शिकवावी लागेल. काहीतरी एक योजना आखतील ते. पीडब्ल्यूडी नुसतं सांगतंय यांचे पण एकेक दोन दोन दिवसाचे कोर्स घेतले पाहिजेत. अनेक नियम आहेत, पण ते कोणी पाळत नाहीत. आवश्यक मराठी त्यांनी शिकलं पाहिजे. आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात. तामिळनाडूमध्ये गेले तर तामिळी बोलतात. येथे सुद्धा कामापुरते त्या लोकांनी मराठीत बोललं पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा मिटणार नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी चर्चा सुरू आहे. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना लपून-छपून भेटण्याचं कारणच काय. कोणीही विरोधी पक्षातील नेता भेटू शकतो. अनेकवेळा लोकांचे कामं असतात, त्यासाठी भेटी होतात. हे नेते सार्वजनिक क्षेत्रातले नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत. पॉलिसी आहे काही काम असेल, अडचण असेल यासाठी मुख्यमंत्र्यांनाच भेटणारच ना. त्याच्यामध्ये लपून-छपून भेटायचे काय कारण ओपनली भेटतील. अशा रीतीने बातम्या पसरवण्याचे काही कारण नाही, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
