Congress-NCP : शरद पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना काँग्रेसने उचललं महत्वाचं पाऊल
Congress-NCP MergerTalk : शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, त्याआधी काँग्रेसने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. आज सकाळीच महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता दिल्लीला रवाना झालाय.

तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तृणमूल काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलिन होणार अशा चर्चा सुरु झाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही काँग्रेसमध्ये विलिन व्हावे, या मोहिमेचे नेतृत्त्व खासदार शरद पवार यांनी करावं असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. काँग्रेसमध्ये कमकुवत झालेल्या प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना आता काँग्रेसने सुद्धा काही महत्वाची पावलं उचलली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणारी चर्चा होत असताना काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे विलिनीकरणाच्या अनुषंगाने चाचपणी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं मत काय? त्यांची भूमिका काय? त्यांना काय वाटतं? याची चाचपणी काँग्रेस हायकमांडकडून सुरु आहे.
राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक मत नोंदवलं आहे. काही नेत्यांनी त्यातील धोके सुद्धा दाखवून दिलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील नेत्यांचं मत जाणून घेण्यात येत असलं तरी अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. फक्त कुठल्याही निर्णयाप्रत येण्याआधी काँग्रेस हायकमांड राज्यातील नेतृत्वाला विश्वासात घेऊन चांगला संदेश देत आहे. आज सकाळीच नाना पटोले दिल्लीला रवाना झाले. ते महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहे. काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आहेत. त्यांना तातडीने दिल्लीला बोलवून घेण्यात आलं आहे. “संसदेत एका विभागाची बैठक आहे, त्यासाठी चाललोय. पण त्यावरुन एवढा मोठा गाजावाजा का होतोय ते कळत नाही” असं नाना पटोले बोलले.
टिकून राहणं हे या पक्षांसमोरचं मुख्य चॅलेंज
भाजपच्या देशव्यापी लाटेत अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष कमकुवत होत चालले आहेत. महाराष्ट्रात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मोठे पक्ष फुटले. एक गट सत्तेत आणि दुसरा विरोधी पक्षात आहे. संख्याबळाने कमकुवत असलेला गट विरोधी पक्षात आहे. आज भाजपच्या राजकारणात टिकून राहणं हे या पक्षांसमोरचं मुख्य चॅलेंज आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचीच विचारधारा असणारे परंतु राज्यांमध्ये वेगळे अस्तित्त्व असलेल्या सर्व स्थानिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे, काँग्रेसला मजबूत करावे, असे विधान केलें.
