Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? दिल्लीला रवाना होताना नाना पटोलेंच सूचक विधान
Congress : "तृणमुल काँग्रेसचाच विषय नाही. राज्यातले जेवढे पक्ष होते, त्यांची नरेंद्र मोदी सरकारने कशी अवस्था केली ते आपण बघतोय. घरात भांडणं लावायची, त्याचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे मोठं उदहारण आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचं, लोकशाही संपवण्याचं काम भाजपं करतेय ते आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय" असं नाना पटोले म्हणाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतलं आहे. त्यामुळे विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. “संसदेत एका विभागाची बैठक आहे, त्यासाठी चाललोय. पण त्यावरुन एवढा मोठा गाजावाजा का होतोय ते कळत नाही” असं नाना पटोले बोलले. “राष्ट्रवादी पवार साहेबांनी प्रस्ताव पहिला दिला होता. पण काही कारणामुळे उशीर झालेला. मला असं वाटतं की, देशात जे राजकारण चाललेलं आहे. देश विकला जातोय, संवैधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी मतांचं विभाजन टाळण्यासाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष आहेत, त्यांनी एकत्रित यावं. अशी प्रक्रिया देश पातळीवर सुरु झालेली आहे” असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
“त्याच प्रक्रियेतंर्गत तृणमुल काँग्रेस, पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांची सोबत येण्याची मानसिकता, भाव पहायला मिळतोय. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी, मल्लिकाजुन खर्गे, सोनिया गांधी या सगळ्यावर मंथन करतील. देश महत्वाचा आहे, संविधान महत्वाचं आहे. काँग्रेस हायकमांड त्याप्रमाणे विचार करतय. कामाला सुरुवात झाली आहे” असं नाना पटोले म्हणाले.
मग, भुजबळांनी संधी गमावली
मला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. पण मला शरद पवारांना सोडायचं नव्हतं म्हणून मी गेलो नाही असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर नाना पटोले म्हणाले की,”छगन भुजबळ काय बोलतात, त्यांना काय प्रस्ताव होता हे मला माहित नाही. मी आता त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. भुजबळ साहेबांकडे क्षमता होती. ते ओबीसीचे मोठे नेते आहेत. ती संधी गमावली असं मी म्हणेन”
“धर्मनिरपेक्ष मतं विभाजित होत होती. त्या मतांना एकत्रित करणं गरजेच आहे. आत्ताच जे देश विकणारं सरकार आहे, मोदी सरकार त्यांना सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे. ते काम काँग्रेस पक्ष करतोय” असं नाना पटोले म्हणाले. प्रादेशिक पक्षांच्या अवस्थेवरही नाना बोलले.
देशहितासाठी काँग्रेससोबत राहिलं पाहिजे
काँग्रेसने विलिनीकरणाची ऑफर दिली का? या प्रश्नावरही नाना पटोले यांनी उत्तर दिलं. “ऑफर आम्ही कोणाला दिलेली नाही. या परिस्थितीचा पवार साहेब,सुप्रिया ताईंनी उल्लेख केलेला आहे. प्रक्रिया सुरु आहे. एकत्रित आलो पाहिजे. मतांचं विभाजन थांबलं पाहिजे. देशहितासाठी काँग्रेससोबत राहिलं पाहिजे अशी राज्य पातळीवरील पक्षांची भूमिका आहे” असं नाना पटोले म्हणाले.
