पुन्हा भयंकर युद्धाला सुरूवात! दोन नवीन देशांचे इराणवर भीषण हल्ले; भारताचं टेन्शन वाढवणारी अपडेट!
Iran Attack : आखाती देशांमधील संघर्षात आता दोन नवीन देशांची एन्ट्री झाली आहे. आखातातील दोन महत्त्वाच्या देशांनी इराणवर भीषण हल्ले केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू आहे, मात्र आता या युद्धात दोन नवीन देशांनी एन्ट्री केली आहे. आखाती देशांपैकी काही देशांनी इराणवर थेट लष्करी हल्ले सुरू केले आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, बहरीन आणि कुवेतने इराणवर थेट हल्ले केले आहेत. या दोन्ही देशांनी सौदी अरेबियाच्या मदतीने इराणमधील क्षेपणास्त्र साठे आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. सौदी अरेबिया त्यांना गुप्तचर माहिती आणि संरक्षणात्मक हवाई मदत देत आहे अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या युद्धाची व्याप्ती वाढली आहे.
आखाती देशांकडून इराणला प्रत्युत्तर
इराणने ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत अशा ठिकाणांवर हल्ले केले आहेत. मात्र या हे आखाती देश केवळ आत्मसंरक्षणाचा प्रयत्न करत होते. इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट केली जात होती. मात्र युद्ध पेटू नये यामुळे आखाती देशांनी कधीही थेट युद्धात सहभाग घेतला नव्हता. मात्र आता इराणकडून होत असलेल्या सतत हल्ल्यांमुळे आता आखाती देशांनीही युद्धासाठी तयारी सुरू केली आहे. सध्या केवळ दोन देशांनी इराणविरोधात लष्करी अभियान सुरू केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, याआधीच्या इराणविरोधातील यूएईच्या कारवाईत सौदी अरेबियाचाही सहभाग होता. आता बहरीन आणि कुवेत यांनी थेट हल्ले सुरु केले आहेत. कारण इराण आखाती देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ आणि लष्करी उपकरणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमध्ये इराणकडून अधिक हल्ले करण्यात आले आहेत. तसेच यूएईमधील अनेक शहरांमध्येही इराणने मोठे हल्ले केले आहे. मात्र आता या दोन देशांनी इराणला थेट उत्तर दिले आहे.
कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला
इराणने म्हटले की, कुवेतमधील कॅम्प उडैरी, कॅम्प दोहा आणि कॅम्प अरिफजान या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेत अली अल सलेम एअरबेसवरही हल्ला करण्यात आला आहे. तसेच बहरीनच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी देशात हवाई हल्ले करण्यात आले, त्यामुळे सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, इराणने जर एखाद्या हल्ल्यात थेट सहभाग घेतला तर त्याचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर होतो. कारण होर्मुझ सामुद्रधुनी हा जगभरातील ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भारतालाही याच मार्गातून मोठ्या प्रमाणावर तेल पुरवठा होतो, त्यामुळे हे युद्ध आणखी वाढले तर आगामी काळात भारताचीही चिंता वाढण्याची शक्यता आहे.
