
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा घातपात असू शकतो, असा खळबळजनक संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेतील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे. विमानाचा अपघात झाला की घातपात, हे स्पष्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला गेला? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला आणि नवीन पायलटची पार्श्वभूमी काय होती? याची पारदर्शक चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळाला आहे. जर काहीच लपवण्यासारखे नसेल, तर तो देश सोडून का गेला? त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारची ही परंपराच झाली आहे की, मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना परदेशात पळू द्यायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय द्यायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलतानाही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अजूनही जनतेसमोर आलेला नाही. गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा मालकही परदेशात पळाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले. पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, ही आमची आणि काँग्रेसची कायमची भूमिका आहे. परंतु, दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. त्यांच्यात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. कुटुंबात वाद नसावा हीच संस्कृती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हे सरकार पूर्णपणे द्वेषपूर्ण भावनेतून चालवले जात आहे. घटनात्मक पदावर बसताना कोणाबाबतही ममत्व किंवा द्वेष ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते. मात्र, मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं.