भाषण झालं, नेते गेले… पण आंदोलक जागा सोडायला तयार नाही, शिवाजी पार्कात आंदोलक आक्रमक; पोलिसांची धावाधाव
दिल्लीमध्ये अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनाला आता शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. नेट पेपर फुटीसह इतर मुद्द्यांवरून हे आंदोलन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोनम वागंचूक यांचं आमरण उपोषण सुरू होतं, परंतु उपोषणाच्या 21 व्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, दरम्यान त्यानंतर आता अभिजीत दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अनेक विरोधी पक्षांनी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून देखील अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडली, या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.
या आंदोलनाला आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली, या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी देखील जोरदार टीका केली. परंतु आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते शिवाजी पार्कवरून निघून गेले. परंतु आंदोलक अजूनही शिवाजी पार्कचं मैदान सोडायला तयार नाहीयते.
शिवाजी पार्कवर आंदोलकांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे, आंदोलकांना मैदान खाली करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आहे. परंतु आंदोलकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत बोलताना भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमची पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची तयारी आहे, मग सोनम वांगचूक यांच्याशी तुम्ही चर्चा का करू शकत नाही? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
