शिवसेनेच्या मंत्र्यांची आता खैर नाही, एकनाथ शिंदेंनी दिला थेट इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचे आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांच्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादांमुळे हा इशारा देण्यात आला आहे.

सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. येत्या दिवाळीनंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच आता आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना चांगल्याच शब्दात दम दिला आहे. वादग्रस्त आणि बेताल वक्तव्ये टाळा, कामावर लक्ष केंद्रित करा आणि विरोधकांच्या आरोपांना कृतीतून उत्तर द्या, अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा कामावर लक्ष द्या
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील काही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षावर सातत्याने टीका होत आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घेत मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. अलीकडच्या काळात शिंदे गटातील काही मंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले. या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून, विरोधकांना टीकेसाठी आयते कोलीत मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा कामावर लक्ष द्या. कोणतीही प्रतिक्रिया देताना किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना काळजी घ्या. तुमच्या बोलण्यामुळे पक्षाची मान खाली जाईल असे कोणतेही विधान करू नका, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
आपापल्या मतदारसंघांमध्ये कामाला लागा
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही विशेष चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्व मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंत्र्याने आपल्या विभागात केलेल्या कामांचा अहवाल तयार करून तो जनतेसमोर मांडण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
विरोधक केवळ आरोप करण्यासाठी बोलतात
विकासकामे हीच आपली ओळख असली पाहिजे. तसेच विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक टीकेला आणि आरोपाला उत्तर देत बसण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण कामातून उत्तर देणारे लोक आहोत. विरोधक केवळ आरोप करण्यासाठी बोलतात, पण आपण प्रत्यक्षात काम करतो. त्यामुळे, त्यांच्या प्रत्येक टीकेला मीडियासमोर प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेला आपली बाजू पटवून द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
