सुनेत्रा पवारांनी महिलांसाठी सुरू केलेली ‘लवकर या-लवकर जा’ योजना नक्की काय आहे?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 'लवकर या-लवकर जा' योजनेबद्दल सविस्तर सांगितले आहे. ही योजना नेमकी काय आहे? चला जाणून घ्या...

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘लवकर या-लवकर जा’ योजना नेमकी काय आहे?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन जितक्या मिनिटांनी आधी काम सुरू करतील, तितक्याच मिनिटांनी संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघता येणार आहे. यामुळे साधारणपणे ३० मिनिटांची सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील गर्दीच्या वेळेत (पीक आवर्स) महिलांना होणारी असुरक्षितता, प्रवासातील त्रास आणि वेळेची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल. महिलांना घर आणि कार्यालय यांच्यातील संतुलन साधणे सोपे होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचे प्रयत्न
विधान परिषदेतील विशेष चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले.
हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबवली जाते. जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ मोहिमांद्वारे ४२,५९४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेतून ५,०६६ महिला आणि २,७७१ बालक सापडले आहेत. सर्व जिल्ह्यांत ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ५१ ‘भरोसा सेल’ सुरू करण्यात आले आहेत.
आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. यामध्ये ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच या उत्पादनांची ऑनलाइन विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिलांच्या विकासासाठी दृढ संकल्प
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षित वातावरण देणारा समाज घडवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या योजनांमुळे महिलांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
