‘आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे’, सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी केलेल्या आरतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

"आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का?", असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे, सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी केलेल्या आरतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी केलेल्या आरतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Sep 12, 2024 | 5:29 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्या भेटीचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला आहे. पण त्यावरुन राजकारण तापताना दिसत आहे. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीला जाणं हे अपेक्षित नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन सडकून टीका केलीय. तसेच राज्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुनही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत यावर भूमिका मांडली आहे. “आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मीचं पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे. हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा, अपमान नाही का? (माहितीसाठी 18 सप्टेंबर 2009 रोजी तत्कालिन पंतप्रधानांच्या निवासस्थानी तत्कालिन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचे फोटो आणि संबंधित बातमीची लिंक)”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.